कल्याणच्या अशोक नगरातील पूरस्थिती हाताबाहेर? लोक घर सोडून नातेवाईकांच्या आश्रयाला

| Updated on: Jul 25, 2024 | 5:24 PM

कल्याणच्या अशोक नगर परिसराला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. अशोक नगर परिसरातील अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. पुराची परिस्थिती पाहता नागरिकांनी आपलं घर सोडून नातेवाईकांकडे जाणं पसंत केलं आहे. तर काही तरुण पाण्यात पोहताना दिसत आहेत.

कल्याणच्या अशोक नगरातील पूरस्थिती हाताबाहेर? लोक घर सोडून नातेवाईकांच्या आश्रयाला
Follow us on

ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात गेल्या चार दिवसांपासून प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. विशेष म्हणजे या पावसाने काल रात्रीपासून रौद्ररुप धारण केलं आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या अशोक नगरमधील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. कल्याणमधील अशोक नगर परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे. अनेक घरे पाण्याखाली गेल्यामुले घरामध्ये राहणारे रहिवासी घर सोडून आपल्या नातेवाईकांकडे जाऊन राहत आहेत. तर दुसरीकडे नदीचा आनंद घेत तरुण या नदीमध्ये पोहताना दिसत आहेत. मात्र नदीचा प्रवाह पाहता मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी देखील काही प्रमाणात पाणी घरात शिरून देखील नागरिक घरामध्ये राहत आहेत. तसेच मुलं देखील नदीमध्ये उड्या मारत जीव धोक्यात घालत असल्याचं दिसून येत आहे.

कल्याणमधील फक्त अशोक नगरच नाही तर अंबिका नगर सोसायटीतही कमरे इतके पाणी साचलं आहे. यामुळे तळमजल्याला राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने तळमजल्याचे रहिवासी आपल्या घरातील सामान घेऊन नातेवाईकांकडे जात आहेत. एकीकडे वालधुनी नदीची पाण्याची पातळी वाढली तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे चाळींसह आता इमारतींमध्ये देखील पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.

बदलापुरात एनडीआरएफची टीम दाखल

कल्याण-नगर मार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे. पाण्यात मुलांचे जीव धोक्यात घालून शाळेतील गाडीचा प्रवास बघायला मिळाला. भर पाण्यात गाडी बंद पडल्याने नागरिकांनी धक्का मारत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. दरम्यान, बदलापुराला पुराचा धोका आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. बदलापुरात एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बदलापूरकरांना एनडीआरएफची मदत होणार आहे.

बदलापूर जवळील भारत कॉलेज जवळील रस्ता पाण्याखाली गेला आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बदलापूरमधील सखल भागात पाणी जमा होऊ लागलं आहे. बदलापूरमधील भारत कॉलेज परिसरात गुडघाभर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना एक ते दीड फूट पाण्यातून जावे लागत आहे.