मृत्यूनंतर दफनासही जागा मिळेना, ठाण्यापासून बदलापूरपर्यंत, अक्षय शिंदे याच्या अंत्यसंस्कारास अनेक स्मशानभूमीत नकार

| Updated on: Sep 29, 2024 | 5:36 PM

अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर सुरुवातीला बदलापूरमध्ये अंत्यविधी केला जाईल, अशी माहिती समोर आली होती. त्यानुसार, पोलिसांनी बदलापूर येथील स्मशानभूमी निश्चित केली होती. पण स्थानिकांनी त्यास विरोध केला. यानंतर अनेक स्मशाभूमीत त्याच्या अंत्यसंस्कारास विरोध करण्यात आला.

मृत्यूनंतर दफनासही जागा मिळेना, ठाण्यापासून बदलापूरपर्यंत, अक्षय शिंदे याच्या अंत्यसंस्कारास अनेक स्मशानभूमीत नकार
Follow us on

बदलापूर येथील अडीच ते चार महिन्यांच्या दोन चिमुकलींवर अत्याचार केल्याच्या आरोप प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा कथित एन्काऊंटर प्रकरणात मृत्यू झालाय. पोलिसांनी स्वत:च्या संरक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावर गोळी झाल्याचं म्हटलं आहे. या घटनेनंतर आता सहा दिवस होऊन गेले आहेत. पण अजूनही अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाही. अक्षय शिंदे याच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. अक्षय शिंदे याची पोलिसांनी हत्या केल्याचा दावा त्याच्या वडिलांचा आहे. तसेच पुरावा नष्ट होऊ नये यासाठी अक्षयच्या मृतदेहाला दहन न करता दफन करण्यात यावं, अशी मागणी अक्षयच्या वकिलांनी कोर्टात केली. ती मागणी हायकोर्टाने मान्य केली. यानंतर राज्य सरकारकडून अक्षयच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करुन दिली जाईल, असं आश्वासन कोर्टात देण्यात आलं होतं. त्यानुसार, राज्य सरकार आणि पोलीस अक्षयच्या दफनविधीसाठी जागा शोधत होती. पण तीन ते चार दिवसांपासून जागा शोधण्यास प्रशासनाला अपयश येत होतं. अखेर उल्हासनगरच्या शांतीनगर येथे आज अक्षयचा मृतदेह दफन केला जाणार आहे.

अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर सुरुवातीला बदलापूरमध्ये अंत्यविधी केला जाईल, अशी माहिती समोर आली होती. त्यानुसार, पोलिसांनी बदलापूर येथील स्मशानभूमी निश्चित केली होती. पण स्थानिकांनी त्यास विरोध केला होता. स्थानिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्मशामभूमीच्या बाहेर पोलीस फौजफाटादेखील वाढवला होता. पण स्थानिकांच्या विरोधामुळे पोलिसांना अक्षयच्या मृतदेहास तिथे दफन करण्यास यश आलं नाही. “अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार बदलापुरात होऊ देणार नाही, अशी भावना मांजर्ली स्मशानभूमी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. ज्याने आमच्या चिमुकल्यांवर अत्याचार केले, त्याचे अंत्यसंस्कार इतर कुठेही करा, पण बदलापूरमध्ये आम्ही हे होऊ देणार नाही”, अशी भूमिका स्थानिकांनी मांडली.

अंबरनाथमध्येही विरोध

बदलापूर येथे अक्षयच्या अंत्यविधीस स्थानिकांनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी अंबरनाथ येथील स्मशानभूमीत अक्षय शिंदे याच्या मृतदेहास दफन करण्याचा निर्णय घेतला. पण तिथेदेखील स्थानिकांनी विरोध केला. अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीत अक्षय शिंदे याच्या दफनविधीला विरोध करण्यात आला. स्मशानभूमीच्या बाजूला शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेधचा बॅनर लावण्यात आला.

कळवा येथे अंत्यविधीस मनसेचा विरोध

अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आलं होतं. यानंतर त्याचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता. गेल्या सहा दिवसांपासून अक्षयचा मृतदेह इथेच ठेवण्यात आला होता. अक्षयच्या अंत्यविधीस बदलापूर येथे विरोध झाल्यानंतर पोलीस जागेच्या शोधात होते. दरम्यान, मनसेच्या ठाण्याचे उपशहराध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी पोलिसांना पत्र पाठवत अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर कळव्यात अंत्यसंस्कार होऊ नये, अशी मागणी केली. त्यामुळे अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास कळवा येथेदेखील विरोध झाला.

उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार होणार

ठाण्यापासून बदलापूरपर्यंत अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यास विरोध होत असल्यामुळे प्रशानापुढे मोठं आव्हान निर्माण झालं होतं. अखेर पोलिसांनी उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्माशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्याचं ठरवलं. त्यानुसार पोलिसांनी आज दफनभूमीत आज पहाटे खड्डा देखील खोदला. पण याबाबतची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यास विरोध करत दफनभूमीतील अक्षयच्या मृतदेहासाठी खोदलेला खड्डा बुजवला. पोलिसांनी संबंधित आंदोलकांची धरपकड करत स्मशानभूमीची जागा मोकळी केली. त्यानंतर जेसीबीने पुन्हा खड्डा खोदला. तर दुसरीकडे कळवा रुग्णालयातून अक्षयचा मृतदेह घेऊन पोलीस उल्हासनगच्या दिशेला निघाले. उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीतच अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.