आग लागताच एकापाठोपाठ एक 15 सिलेंडरचा धाड धाड स्फोट, ठाणे हादरले; अग्नितांडव सुरूच

| Updated on: Oct 02, 2024 | 7:33 PM

ठाण्यात आगीची मोठी घटना घडली आहे. एका चिप्सच्या कंपनीत आग लागली आहे. आग लागल्यानंतर संबंधित कंपनीतून एकापाठोपाठ अशा तब्बल 15 वेळा सिलेंडरच्या स्फोटाचा आवाज आला. त्यामुळे परिसरातील नागरीक भयभीत झाले आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांकडून गेल्या 3 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

आग लागताच एकापाठोपाठ एक 15 सिलेंडरचा धाड धाड स्फोट, ठाणे हादरले; अग्नितांडव सुरूच
ठाण्यात भीषण अग्नितांडव
Follow us on

ठाण्यात आगीची मोठी घटना घडली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एका कंपनीला ही आग लागली आहे. संबंधित कंपनीला आग लागताच एकापाठोपाठ एक अशा तब्बल 15 सिलेंडरचा धाड धाड स्फोट झाल्याचा आवाज परिसरात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. आग नेमकी कशामुळे लागली? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण गेल्या तीन तासांपासून ही आग धुमसत आहे. या आगीत कितपत नुकसान झालं आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही. आगीत कुणी जखमी झाले आहे का? याबाबतची माहिती देखील अद्याप समजू शकलेली नाही. पण आगीत संबंधित कंपनी जळून खाक होताना दिसत आहे. आगीमुळे धुरांचे मोठमोठे लोळ हवेत मिसळताना दिसत आहेत. हे लोळ पाहिल्यानंतर आग किती भीषण आहे याचा प्रत्यय येतोय.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरात वागळे इस्टेट परिसरात असणाऱ्या एका चिप्सच्या कंपनीला ही आग लागली आहे. व्यंकट रमण फूड कंपनी असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीत चिप्स आणि कुरकुरे निर्माण केले जातात. या कंपनीत वेफर आणि पुठ्ठ्यांना आग लागली आहे. ही आग प्रचंड भडकली आहे. आग लागल्यानंतर एकापाठोपाठ तब्बल 15 सिलेंडरच्या स्फोटाचे आवाज आला. त्यामुळे परिसरातील नागरीक भयभीत झाले.

10 अग्निशमन बंब आणि 8 टँकर घटनास्थळी दाखल

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. पण आग विझवण्यात अद्यापही यश आलेलं नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत 10 अग्निशमन बंब आणि 8 टँकर घटनास्थळी आणण्यात आले आहेत. पण आग विझायचं नाव घेताना दिसत नाहीय. त्यामुळे परिसरातील नागरीकदेखील भयभीत झाले आहेत.

अग्निशामक दलाच्या जवानांकडून गेल्या तीन तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी मीरा रोड, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण शहरातून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनेचं गांभीर्य ओळखून आणि संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी आगीच्या आजूबाजूचा परिसर रिकामा केला आहे. तसेच विद्युत लाईन देखील बंद ठेवण्यात आली आहे.