विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरुन रस्सीखेच, कोण कुठं, मोठा भाऊ?

| Updated on: Sep 18, 2024 | 12:55 AM

महाविकास आघाडीच्या बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. ज्यामुळं मविआत कोण किती जागांवर लढणार यावर चर्चा होईल. काही दिवसांआधी नितीन राऊतांनी काँग्रेसचं मोठा भाऊ असं म्हटलं होतं. त्यावर राऊतांनी, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच हायकमांड असल्याचं प्रत्युत्तर दिलं आहे. तर महायुतीत समन्वय असल्याचा मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरुन रस्सीखेच, कोण कुठं, मोठा भाऊ?
Follow us on

गणपती बाप्पाचं विसर्जन झालं. आता पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरु होणार आहे. महायुतीत समन्वयानं जागा वाटप होईल आणि पुन्हा महायुतीचंच सरकार येईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केलाय तर, संजय राऊत यांनी शिंदेंना 40 जागा भाजप देईल आणि 5-10 अधिकच्या जागा शिंदेंच्या तोंडावर फेकतील, अशी जळजळीत टीका केली आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा पुढचे 3 दिवस सुरु राहणार आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसनं 125 जागांची मागणी केल्याचं कळतं आहे. मात्र काँग्रेसलाच मविआत सर्वाधिक 105 जागा मिळू शकतात. ठाकरेंची शिवसेना 95-100 जागा लढण्याची शक्यता आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 85-90 जागा मिळू शकतात.

लोकसभा निवडणुकीत 48 जागांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेनं 21 जागा लढून 9 जागा जिंकल्या..पण काँग्रेसनं 17 पैकी 13 जागा जिंकल्या…
मात्र तरीही लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणंच, सर्वाधिक जागा ठाकरेंच्या शिवसेनेलाच हव्यात असं संजय राऊतांच्या बोलण्यातून दिसतंय…महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच हायकमांड असल्याचं राऊत म्हणाले आहेत.

नुकतंच महामंडळ वाटपात फक्त शिवसेनेच्या आमदारांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचं नाव नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावललं जातंय का ? यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी विचारले असता, आमचे कुठलेली आमदार नाराज नाही. आम्हाला आता लोकांपर्यंत जायचं आणि त्यांचा आशीर्वाद मागायचं आहे. हे सगळे विषय बाजूलाच केलेले बरं. आपपल्या मतदारसंघांमध्ये काम करून लोकांच्या विश्वास अर्जित केलं पाहिजे. असे प्रफुल पटेल गोंदियात म्हणाले आहेत. विधानसभा जागावाटपावर अधिकृत चर्चा झालेली नाही. एक दोन दिवसानंतर बैठका सुरू होतील असं ही राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे.

एक-दोन दिवसांमध्ये बैठका होणार असून महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत तसेच आमची सरकार पुन्हा आली तर आम्ही नागरिकांना आणखी चांगले योजना देऊ असेही प्रफुल पटेल म्हणाले आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपासह मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुनही स्पर्धा आहे. मात्र निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंचा आग्रह असला तरी, चेहरा घोषित होणार नाही हे काँग्रेस आणि शरद पवारांनीही स्पष्ट केलं. महायुतीकडून फडणवीसांनीही निकालानंतरच केंद्रीय नेतृत्वच निर्णय घेईल असं म्हटलं आहे. जनता जर्नादन ठरवेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. जनतेचा निकाल 26 नोव्हेंबरच्या आत येईल.