मतदानाच्या दिवशी दोन कर्मचारी आणि एका जवानाचा मृत्यू, तिघेही धुळे-जळगावचे

| Updated on: May 15, 2024 | 2:20 PM

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा सुरू असतानाच दोन दु:खद घटना घडल्या आहेत. जळगाव येथे ड्युटीवर असलेल्या दोन निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. तर धुळ्यातील एका जवानाचा अरुणाचल प्रदेश येथे मृत्यू झाला आहे. कर्तव्यावर असताना या तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मतदानाच्या दिवशी दोन कर्मचारी आणि एका जवानाचा मृत्यू, तिघेही धुळे-जळगावचे
election staff
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मतदानावेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून महाराष्ट्रासह देशभरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचं काम चोखपणे बजावलं होतं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पण दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना दोन निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. हे दोघेही जळगाव जिल्ह्यातील आहेत. तर एका जवानाचाही मृत्यू झाला असून तो धुळ्याचा आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत असताना एकूण तीन जणांना मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात सोमवार 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण 58.47 टक्के तर रावेर लोकसभा मतदार संघात 64.28 टक्के मतदान झाले. या निवडणुकीच्या मतदानाच्या तयारी दरम्यान दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

आर्थिक मदत देणार

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदान वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी परीक्षक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. आज त्याचा निकाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केला. यावेळी त्यांनी दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती दिली. जिल्हा प्रशासनाकडून मतदानाच्या तयारीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या तयारी दरम्यान नियुक्त महापालिकेचा क्लार्क आणि होमगार्ड अशा दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मयत कर्मचाऱ्यांना शासनाची भरपाई मिळावी या संदर्भात अहवाल पाठवण्यात येणार असल्याच यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले.

धुळ्यातील जवानाचा मृत्यू

दरम्यान, ही घटना ताजी असतानाच शेरगाव (अरुणाचल प्रदेश) येथील 73 बटालियन सशस्र सीमा सुरक्षा दलात असलेल्या जवानाला वीर मरण आलं. कमलेश ज्ञानेश्वर कदम असं या जवानाचं नाव आहे. धुळे जिल्ह्यातील मूळचा गोराणे (ता. शिंदखेडा) येथील हा जवान होता. काल 14 मे रोजी दुपारी 3 वाजता त्यांचा मृत्यू झाला. कमलेश हे कडप्पा (आंध्रप्रदेश) येथे निवडणूक बंदोबस्तावर होते. कर्तव्य बजावून सुट्टी झाल्यानंतर ते आरामाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पाच दिवसात बातमी आली

कमलेश यास वीरमरण आल्याची बातमी काल सायंकाळी येथे पोहोचताच त्यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली. कमलेश कदम हे सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. नुकतेच ते धुळ्यात आले होते. आठवड्याभोरा पूर्वी ते ड्युटीवर गेले होते. मात्र पाच दिवसात त्यांच्या मृत्यूची बातमी गावात धडकल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील भाऊ पत्नी आणि दोन जुळे मुल आहेत.