उद्धव ठाकरे यांचा राहुल नार्वेकर यांच्यावर सर्वात गंभीर आरोप, म्हणाले…

| Updated on: Mar 08, 2024 | 3:52 PM

उद्धव ठाकरे यांची धाराशिवच्या कळंब येथे सभा पार पडली. या सभेत त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. राहुल नार्वेकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी ठाकरे गटाच्या विरोधात निकाल दिला, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांचा राहुल नार्वेकर यांच्यावर सर्वात गंभीर आरोप, म्हणाले...
Follow us on

धाराशिव | 8 मार्च 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर दिलेला निकाल हा ठाकरे गटाच्या विरोधात आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली जाते. उद्धव ठाकरे यांनी आज सुद्धा राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. धाराशिवच्या कळंब येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या कार्यक्रमात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केला. “लोकसभा उमेदवारीसाठी राहुल नार्वेकरांनी आमच्याविरोधात निकाल दिला”, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. “देवेंद्रजी पाव उपमुख्यमंत्री गुजरातचे की महाराष्ट्राचे?”, असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच “भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न झाला”, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“राहुल नार्वेकर लबाड आहेत. आता भाजपकडून लोकसभा निवडणूक लढत आहेत. मी आज आरोपच करतोय. तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालच दाखवून तुम्ही माझ्या शिवसेनेच्या विरोधात निरोप द्यायला लावलात हा माझा आरोप आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने काल म्हटलं आहे, तुम्ही म्हणजे त्या लवाद्याने जो निकाल दिलेला आहे, तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात वाटत नाही काय? हा सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

‘फडणवीस गुजरातचे पाव मुख्यमंत्री’

“म्हणे, इथून उद्योग गुजरातला गेले तर गुजरात काय पाकिस्तान आहे का? ठिक आहे तुम्ही त्यांची खुर्ची चाटताय तुमच्यासाठी ते देवेंद्रजी बरोबर आहे. पण गुजरात हा जर पाकिस्तान म्हणत असाल तर मग महाराष्ट्र हा काय पाकिस्तान आहे का? देवेंद्रजी तुम्ही पाव उपमुख्यमंत्री राहिला आहात ते महाराष्ट्राचे की गुजरातचे आहात? मग जाहीर करा. देवेंद्र फडणवीस गुजरातचे पाव मुख्यमंत्री”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“लोकसभेच्या उमेदवारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर झालं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव जाहीर झालं. बेहिशोबी मालमत्ता गोळा केली म्हणून आरोप झालेल्या कृपाशंकर सिंह यांच नाव जाहीर झालं, पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव जाहीर झालं नाही. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं काय करणार ते माहीत नाही. पण गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे सुद्धा आम्हाला ठाकरे कुटुंबियांना कुटुंबियांसारखे होते. मोदीजी तुमच्या आणि अमित शाह नावाच्या व्यक्ती या देशात आहेत हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं तेव्हापासून आम्ही प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांना ओळखतो आणि त्यांच्या कुटुंबियांचं नातं हे त्याहीवेळेला होतं हे आजसुद्धा मी मानतो”, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.