निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे, फडणवीसांची दिलजमाई? महायुतीमधील केंद्रीय मंत्र्याचा दावा

| Updated on: Oct 27, 2024 | 6:00 PM

काही दिवसांपूर्वी फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचं वृत्त समोर आलं होतं, त्यानंतर आता केंद्रीय मंत्र्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे, फडणवीसांची दिलजमाई? महायुतीमधील केंद्रीय मंत्र्याचा दावा
Follow us on

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागा वाटप जवळपास निश्चित झालं आहे, महायुतीमधील तीन प्रमुख घटक पक्ष भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं अनेक विधानसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारांची देखील घोषणा केली आहे. मात्र महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआयला या विधानसभा निवडणुकीत एकही मतदारसंघ सोडण्यात आलेला नाही, यावरून रामदास आठवले चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

नेमकं काय म्हटलं आठवले यांनी?

‘मी आणि माझ्या पक्षातले अनेक कार्यकर्ते नाराज आहेत, छोटा जरी पक्ष असला तरी जागा हव्या होत्या.  मागे फडणवीसांना पत्र दिले होते, किमान 5 जागा द्या अशी मागणी होती. जागा मिळाल्या नाहीत त्यामुळे नॉमिनेशनसाठी जाणार नसल्याचं कार्यकर्ते म्हणत आहेत. 2012 मध्ये भाजपसोबत आलो. आज आरपीआय कुठेच दिसत नाही. मी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. धारावी किंवा चेंबूरची जागा मिळावी हा आमचा आग्रह होता. महामंडळाची देखील मागणी केली आहे. जिल्हा परिषद, महापालिकेसंदर्भात देखील चर्चा झाली आहे. आरपीआयला डावलून चालणार नाही. आम्हाला सत्तेत वाटा मिळाला पाहिजे. मी महायुतीच्या बाजूनं आहे. मी केंद्रात मंत्री असल्यानं इतर राज्यात देखील पक्षाच्या जागा वाढवतो.

त्यामुळे आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत. मला वाईट वाटतंय, आम्ही सातत्यानं महायुतीसोबत आहोत. पण जागा मिळाल्या नाहीत. आम्हाला नांदेडमधील जागा हवी होती. अनेक जागा हव्या होत्या. आम्ही चार ते पाच जागांची अपेक्षा ठेवली होती. मात्र आम्हाला जागा मिळाल्या नाहीत. मी फडणवीसांना पत्र लिहीलं आहे, त्यात मागण्या केल्या आहेत. आम्हाला एक एमएलसी देखील हवी आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करतानाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील ऑफर दिली आहे. काँग्रेस पक्ष तुम्हाला मजबूत करण्याऐवजी खिळाखिळा करत आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुतीकडे परत यावं, उद्धव ठाकरे हे महायुती सोबत राहिले असते तर एकनाथ शिंदे फुटलेच नसते. देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांची भेट निवडणुकीनंतर होऊ शकते, असंही आठवले यांनी म्हटलं आहे.