महाराजांचा पुतळा कोसळल्याने वैभव नाईक यांनी फोडलं बांधकाम विभागाचे कार्यालय

| Updated on: Aug 26, 2024 | 4:55 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. छत्रपतींचा पुतळा कोसळल्याने बांधकाम विभागाचे कार्यालय आमदार वैभव नाईक यांनी फोडले आहे. कारण या पुतळ्याची निगा राखण्याची जबाबदारी या विभागाची होती.

महाराजांचा पुतळा कोसळल्याने वैभव नाईक यांनी फोडलं बांधकाम विभागाचे कार्यालय
Follow us on

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानं उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाले आहे. मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची आमदार वैभव नाईक यांनी तोडफोड केली आहे. पुतळ्याची देखभाल व निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. त्यामुळे या विभागाचे कार्यालय फोडण्यात आले आहे.

स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने अत्यंत घाईगडबडीत सरकारने पुतळा उभारला व उद्घाटन केले. त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे छत्रपती संभाजीराजे व शिवभक्तांनी कळवले होते. आजच्या घटनेने असंख्य शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे कार्य उत्तुंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे नेता येत नसतील तर किमान त्या विचारांना ठेच लागेल असे कृत्य करू नका.’

मनोज जरांगे काय म्हणाले

मनोज जरांगे पाटील यांनी देखील या घटनेनवरुन सरकारवर टीका केलीये. ते म्हणाले की, ‘दैवत देखील कळत नाही. त्यांच्या पुतळ्याच्या देखील भ्रष्टाचार केलाय. यात मोदींनी उद्घाटन केले म्हणून त्यांचा दोष नाही. महापुरुषांच्या पुतळ्याच काम असं व्हायला नको. यांना कायमची अद्दल घडवायला हवी. हे स्मारक बांधणाऱ्यांना जेलमध्ये टाका. मोदी साहेबांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उदघाटन केलेलं आहे. ते स्मारक व्हायला हवं.’

संभाजीराजे यांची प्रतिक्रिया

डिसेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट – सिंधुदुर्ग येथे उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प आज कोसळले. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. “मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार ! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.”