लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा आरोप काय?

| Updated on: Oct 01, 2024 | 9:50 PM

विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. पण उपमुख्यमंत्री फडणवीसांनी व्होट जिहादवरुन आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 14 मतदारसंघात व्होट जिहादमुळं पराभव झाल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे. त्यामुळं मुस्लीम बहुल परिसरातील एकगठ्ठा मतांमुळं भाजपचं टेंशन वाढल्याचं दिसतंय.

लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा आरोप काय?
Follow us on

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्होट जिहादवरुन गंभीर आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादमुळंच पराभव झाला. एकगठ्ठा मतांमुळं हिंदुत्ववाद्यांच्या पराभवाची रणनीती आखण्यात आल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. 48 पैकी 14 मतदारसंघात व्होट जिहाद झाल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांमुळं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला असं सांगतानाच फडणवीसांनी धुळे लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं.

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी भाजपच्या सुभाष भामरेंचा अवघ्या 3 हजार 831 मतांनी पराभव केला.
धुळे ग्रामीणमध्ये भाजपच्या भामरेंना 1 लाख 39 हजार 721 मतं मिळाली तर शोभा बच्छाव 75 हजार 923 मतं मिळाली इथं भामरेंनी आघाडी घेतली 63 हजार 798 मतांची.

धुळे शहरमध्ये भामरेंना 93 हजार 262 मतं आणि बच्छाव यांना 88 हजार 438 मतं. भामरेंना आघाडी आहे, 4 हजार 824 मतांची

शिंदखेडा भामरेंना 1 लाख 11 हजार 849 आणि बच्छाव यांना 68 हजार 424….भामरेंना आघाडी आहे, 43 हजार 425 मतांची

बागलान भामरेंना 1 लाख 166 मतं आणि बच्छाव यांना 78 हजार 253 मतं…भामरेंना आघाडी आहे, 21 हजार 913 मतं

मालेगाव बाह्या मध्ये भामरेंना 1 लाख 27 हजार 454 मतं आणि बच्छाव यांना 72 हजार 242 मतं…भामरेंना आघाडी आहे, 55 हजार 212 मतांची

मालेगाव मध्य भामरेंना फक्त 4 हजार 542 मतं मिळाली आणि बच्छाव यांना तब्बल 1 लाख 98 हजार 869 मते. इथंच शोभा बच्छाव यांनी पाचही मतदारसंघाची पिछाडी भरुन काढली. मालेगाव मध्य मध्ये बच्छाव यांना आघाडी आहे. तब्बल 1 लाख 94 हजार 327 मतांची. हा मतदारसंघ मुस्लीम बहुल आहे. इथूनच पंजावर प्रचंड मतदान झालं.


मात्र गृहमंत्र्यांना मुस्लिम समाजाला उद्देशून व्होट जिहादवगैरे उद्देशून बोलणं शोभत नाही. त्यामुळं त्यांनी माफी मागावी असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मुस्लिमांची एकगठ्ठा मतं महाविकास आघाडीकडे झुकली हे लोकसभा निवडणुकीची आकडेवारी स्पष्टपणे सांगते. त्याचाच सर्वाधिक फटका भाजपला बसला. कारण भाजप 23 वरुन 9 खासदारांवर आली. त्यालाच फडणवीस व्होट जिहाद म्हणत आहेत.