Election | तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार महाराष्ट्रात

| Updated on: Nov 25, 2023 | 3:24 PM

five state election | तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार महाराष्ट्रातही सुरु आहे. महाराष्ट्रातील असणाऱ्या या गावकऱ्यांना तेलंगणाने अधिक सवलती दिल्या आहेत. गावातील नागरिकांकडे दोन्ही राज्यातील आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आहे.

Election | तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार महाराष्ट्रात
Follow us on

निलेश दहाट, चंद्रपूर, दि. 25 नोव्हेंबर 2023 | सध्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम विधाससभेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर रोजी होणार आहे. शनिवारी राजस्थानमधील विधानसभेच्या १९९ जागांसाठी मतदान होत आहे. तेलंगणा विधानसभेसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यामुळे तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. हा प्रचार महाराष्ट्रात सुरु आहे. महाराष्ट्रातील 14 गावात तेलंगणा विधानसभेचा प्रचार जोरात सुरु आहे. केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीसह सर्वच पक्ष या गावांमध्ये प्रचार करत आहे. यामुळे गावकरी तेलंगणा विधानसभा निवडणूक प्रचाराचा आनंद घेत आहेत.

का करत आहे महाराष्ट्रात प्रचार

चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर आहे. चंद्रपूरमधील जिवती तालुक्यातील 14 गावे सीमेवर आहेत. मुकादमगुडा, परमडोली, परमडोली (तांडा), कोठा, लेंडीजाला, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती, अंतापूर, इंदिरानगर, येसापूर, पलसगुडा, भोलापठार, लेंडीगुडा या गावांमधील मतदार तेलंगणा राज्यात मतदान करतात. या गावांमधील एकूण 3500 मतदार महाराष्ट्र आणि तेलंगणा दोन्ही राज्यांचे मतदार यादीत आहेत. या दोन्ही राज्यांनी त्यांना मतदार म्हणून घोषित केले. तसेच या सर्व मतदारांना ओळखपत्रेही दिली आहेत. या गावांसंदर्भात दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे. या 14 गावांवर महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकार आपआपला अधिकार असल्याचा दावा करत आहे.

गावकऱ्यांना तेलंगणाने दिल्या अधिक सवलती

महाराष्ट्रातील असणाऱ्या या गावकऱ्यांना तेलंगणाने अधिक सवलती दिल्या आहेत. या गावातील नागरिकांकडे दोन्ही राज्यातील आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आहे. या गावांची प्रमुख मागणी वन जमिनीचे पट्टे देण्याची आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने त्या गावांना वन जमिनीचे पट्टे देऊ शकला नाही. मात्र तेलंगणा सरकारने या गावांना जमिनी वनचे जमिनीचे पट्टे वाटप केले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत तेलंगणा सरकारने या गावात अधिक विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांचा कल तेलंगणा राज्याकडे अधिक आहे.