‘त्या’ निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय डील झाली?; फडणवीस यांचा गौप्यस्फोट काय?

| Updated on: May 17, 2024 | 5:45 PM

आम्ही 400 पारचा नारा मागे घेतला नाही. आम्ही संविधान बदलणार हे पहिल्यांदाच नाही यापूर्वीही विरोधक बोलत होते. 2014 पासून ते 2019पर्यंत आमच्याकडे पूर्ण बहुमत होतं. पण आम्ही तसं काही केलं नाही. संविधान बदलणं सोडाच पण ज्या जम्मू काश्मीरमध्ये भारताचं संविधान लागू नव्हतं. तिथे आम्ही भारताचं संविधान लागू केलं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

त्या निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय डील झाली?; फडणवीस यांचा गौप्यस्फोट काय?
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुलाखत देत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या डील झाली होती. या डीलनुसार आमच्या जागा पडल्या, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. फडणवीस यांच्या या आरोपांना उद्धव ठाकरे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे गौप्यस्फोट केले. निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं डीलिंग झालं होतं. शरद पवार त्यांना म्हणाले, भाजपची एवढी हवा आहे की त्यांचे एकट्याचे 130 आमदार येतील. त्यामुळे भाजप तुम्हाला विचारणार नाही. तुम्ही एक प्रयत्न करा… जिथे भाजप आमच्याविरोधात लढतंय तिथे आम्हाला मदत करा. भाजपच्या जागा कमी करा. जिथे काँग्रेस लढतंय, तिथे आम्ही तुम्हाला मदत करू. जेणे करून तुमच्या काही जागा वाढेल. दोन्ही पक्षाचं महत्त्वं राहील. त्या निवडणुकीत पुण्यात आमच्या दोन्ही जागा पडल्या. त्या साडेचार हजार मताने पडल्या. शिवसेना त्यावेळीच महाविकास आघाडी समजून राष्ट्रवादीसोबत काम करत होती. आता ते स्टोरी रचत आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तीन राज्यांपेक्षा जास्त गुंतवणूक

मी मुख्यमंत्री होण्यापूर्वीच चार पाच वर्ष गुजरात गुंतवणुकीत नंबर वन होतं. माझ्या आधी. मी मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. गुजरात आपल्या खिजगणतीतही नव्हता. हे मुख्यमंत्री झाले. काय झालं? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कर्नाटक पहिल्या क्रमांकावर गेला. दुसऱ्या वर्षी गुजरात पहिल्या क्रमांकावर गेला. त्यानंतर पुन्हा आमचं सरकार आलं. आम्ही पहिल्या क्रमांकावर आलो. गुजरात, कर्नाटक, दिल्ली यांची जेवढी एकत्रित गुंतवणूक आहे, त्यापेक्षा अधिक आपली गुंतवणूक होती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आमच्या मागे मोदी होते

उद्धव ठाकरे यांनी कितीही मोदी आणि शाह यांच्या नावाने आकांडतांडव केलं तरी वास्तव हे वेगळं आहे. हे सत्तेत असताना यांनी मुंबईत कोस्टल रोड का केला नाही? मेट्रोचं काम का मार्गी लावलं नाही? आम्ही केलं. कारण आमच्या मागे मोदी होते. मोदी महाराष्ट्राच्या मागे खंबीर उभे राहिले म्हणून राज्यातील प्रकल्प झाले. यांनी कितीही शिव्या शाप दिल्या तरी फरक पडत नाही, असंही ते म्हणाले.