हर्षवर्धन पाटील यांनी कमळ सोडून तुतारी का घेतली हाती? कारणं काय

| Updated on: Oct 03, 2024 | 9:21 PM

शरद पवारांनी पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का दिलाय. कारण हर्षवर्धन पाटलांनी भाजपला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सकाळी हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेवून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय जाहीर करणार आहेत.

हर्षवर्धन पाटील यांनी कमळ सोडून तुतारी का घेतली हाती? कारणं काय
Follow us on

भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं अखेर ठरलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन तुतारी हाती घेण्याचा निर्णय झाला आहे. हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी मुंबईतल्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर शरद पवारांची भेट घेतली आणि आता सकाळी 10 वाजता इंदापुरात पत्रकार परिषदेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा करतील. एकीकडे हर्षवर्धन पाटील शरद पवारांना भेटले दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांचे सुपुत्र राजवर्धन पाटील आणि अंकिता पाटलांनी व्हॉट्सअॅपवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तुतारी चिन्हाचं स्टेट्सही ठेवलं. वडिलांच्या घोषणेनंतर अंकिता पाटीलही भाजपच्या युवा मोर्चाचा राजीनामा देणार आहेत.

तुतारी हातात घेणार

हर्षवर्धन पाटलांची काही दिवसांआधी शरद पवारांसोबत भेट झाली होती. त्याचवेळी हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार हे निश्चित झालं होतं. आता हर्षवर्धन पाटलांचा निर्णय झालाय. तसे संकेत त्यांनी 5 दिवसांआधीच दिले होते. इकडे इंदापुरातल्या हर्षवर्धन पाटलांच्या राहत्या घराबाहेर समर्थकांनी फटाके फोडले आणि तुतारीही वाजवत जल्लोही केला. आता हर्षवर्धन पाटलांनी भाजपला सोडण्याचा निर्णय का घेतला, ते ही समजून घेऊया.

का घेतला भाजप सोडण्याचा निर्णय?

हर्षवर्धन पाटील इंदापुरातून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र इंदापुरातून सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दत्ता मामा भरणे आमदार आहेत. भरणे स्टँडिंग आमदार असल्यानं आणि दादा गटालाच जागा सुटणार असल्यानं हर्षवर्धन पाटलांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता इंदापुरात दत्ता मामा विरुद्ध हर्षवर्धन पाटील असाच सामना रंगणार आहे.

काँग्रेस सोडून आले होते भाजपात

2019 मध्येही याच दोघांमध्ये थेट लढत झाली होती. 2019 ला ऐन निवडणुकीआधी हर्षवर्धन पाटील काँग्रेसला रामराम करत भाजपात आले होते. राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंना 1 लाख 14 हजार 960 मतं मिळाली होती. तर भाजपच्या हर्षवर्धन पाटलांना 1 लाख 11 हजार 850 मतं मिळाली होती. अवघ्या 3 हजार 110 मतांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला होता. मात्र या पराभवानंतर आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत आल्यावरही विधान परिषदेवर त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं नाही. त्यामुळं हर्षवर्धन पाटलांनी अखेर तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.