गोव्यात पर्यटकांचा छळ, संख्या घटली; भाजपच्या आमदारांची थेट तक्रार

| Updated on: Sep 22, 2024 | 9:35 PM

नेहमी राजकीय बातम्यांनी चर्चेत असलेला गोवा सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. गोव्यातील भाजपच्या आमदारांनी राज्यातील वाहतूक पोलिसांच्या कारभाराचा पर्दाफाश केला आहे. गोव्यातील वाहतूक पोलिसांकडून पर्यटकांचा मोठा छळ केला जात आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटकांची संख्या कमी झाल्याची तक्रार भाजपच्या आमदारांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

गोव्यात पर्यटकांचा छळ, संख्या घटली; भाजपच्या आमदारांची थेट तक्रार
goa traffic police
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांकडूनच त्रास दिला जात आहे. पोलिसांकडूनच या पर्यटकांचा छळ केला जात आहे. तशी तक्रारच गोवा भाजपच्या विधायकाच्या एका समूहाने राज्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेऊन केली आहे. पर्यटक नेहमी भाड्याने गाड्या घेतात. पण त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याच्या बहाण्याने वाहतूक पोलीस पर्यटकांचा छळ करत आहेत, असं या आमदारांनी तक्रारीत म्हटलं आहे. याच कारणाने राज्यातील पर्यटकांची संख्या रोडावली असल्याचा दावाही या आमदारांनी केला आहे.

भाजपचे आमदार मायकल लोबो, केदार नाइक आणि डेलिलाह लोबो या तिघांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. तसेच वाहतूक पोलिसांकडून होणारा पर्यटकांचा छळ थांबवण्यासाठी आदेश देण्याची विनंतीही या तिन्ही आमदारांनी केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 40 टक्क्यांनी घट झाली आहे. पर्यटकांना वाहतूक पोलिसांकडून मोठा दंड आकारला जात आहे. त्यांचा छळ केला जात आहे. त्याचाच हा परिणाम आहे. अनेक पर्यटक गोव्यात बराच काळ थांबतात आणि खर्च करतात. पण वाहतूक पोलिसांच्या त्राासमुळे पर्यटकांचा गोव्यातील मुक्काम कमी झाला आहे. त्याचा फटका थेट राज्याच्या तिजोरीवर पडला आहे. दक्षिण गोव्यात तर पर्यटकांची संख्या प्रचंड रोडावली आहे. त्यामुळेच हॉटेल आणि घरमालकांकडून भाड्यामध्ये प्रचंड कपात करण्यात आली आहे, असंही या आमदारांनी महासंचालकांना सांगितलंय.

2023 मध्ये दंडापोटी वाहतूक पोलिसांनी लाखो रुपये वसूल केले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या पैसे कमावण्याच्या रॅकेटमध्ये फसलेल्या पर्यटकांकडूनच ही रक्कम वसूल केली गेली आहे. एक तर पर्यटनासाठी खर्च करून यायचा. त्यात पोलिसांच्या छळामुळे आणखी आर्थिक भार सोसायचा यामुळे हे पर्यटक हतबल झाले असून त्यांनी गोव्याकडे येणं बंद केलं आहे. पर्यटकांच्या या निर्णयामुळे गोव्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि टूर ऑपरेटरांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे.

15 मिनिटे वाट पाहावी लागतेय

भाड्याने दुचाकी किंवा इतर वाहन घेणाऱ्या पर्यटकांना वाहतूक पोलीस थांबवून ठेवत आहे. आवश्यक कागदपत्र दाखवल्यानंतरही त्यांना थांबवून ठेवून त्रास दिला जात आहे, असं मायकल लोबो यांनी सांगितलं. कलंगुटे यांनी पत्रकारांशी संवाद साधून या प्रकारावर संताप व्यक्त केला. भाड्याने दिलेल्या वाहनांचे कागदपत्र व्यवस्थित नसतील तर वाहन भाड्याने देणाऱ्याला पकडलं पाहिजे. पण कधी कधी पर्यटकांनाच रोखलं जातं. अनेकदा तर परवाना आणि अन्य दस्ताऐवज चेक करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाण्यासाठी 15 मिनिटे वाट पाहावी लागत आहे, असं कलंगुटे यांनी सांगितलं.

एकाच व्यक्तीची नऊ वेळा तपासणी

वाहतूक पोलिसांनी एकाच पर्यटकाला नऊ वेळा दस्ताऐवज चेक करण्यासाठी रोखून धरल्याचं प्रकरणही समोर आलं आहे. त्यामुळे पर्यटकांना गोव्यातील हा मनस्तापाचा अनुभव घेऊनच आपल्या राज्यात जावं लागत आहे. त्यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे, असंही कलंगुटे यांनी म्हटलंय. दरम्यान, पर्यटकांना वाहतूक पोलिसांकडून छळ होत असल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रकार थांबवण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देणार असल्याचं पोलीस महासंचालकांनी सांगितल्याचा दावा या आमदारांनी केला आहे.

क्यूआर कोड प्रणाली सुरू करणार

एक क्यूआर कोड आधारीत प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. एकदा एखाद्या पर्यटकाच्या कागदपत्रांची चौकशी झाल्यानंतर पुन्हा त्याची दुसऱ्यांदा तपासणी केली जाणार नाही, यासाठी ही प्रणाली असेल असं डीजीपीने सांगितल्याचं आमदार केदार नाइक यांनी सांगितलं.

प्रस्तावित क्यूआर कोड प्रणालीचं आम्ही स्वागतच करतो. त्यामुळे राज्याच्या पर्यटन विभागाला त्याचा फायदाच होईल. आंतरराष्ट्रीय पर्यटक सुट्ट्यांसाठीच्या यादीतून गोव्याला हटवत आहेत. त्यामुळे गोव्याला मोठं नुकसान होणार आहे. गोव्याचं उत्पन्नच पर्यटनावर अवलंबून आहे, असं लोबो यांनी सांगितलं.

तर गोव्यासाठी चांगलं ठरणार नाही

वाहतूक पोलिसांकडून पर्यटकांचा छळ केला जात आहे. त्यामुळे गोव्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. भाजपचे तीन आमदार पोलीस महासंचालकांना भेटले. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारच जेव्हा पोलिसांच्या प्रमुखांकडे जाऊन तक्रार करतात, यावरून प्रशासन पूर्णपणे ढासळल्याचं दिसून येत आहे. पर्यटकांचा छळ थांबवा ही आमची मागणी आहे. पर्यटकांवरच गोव्याचं अर्थकारण अवलंबून आहे. त्यामुळे पर्यटकांचा छळ थांबला पाहिजे. नाही तर गोव्यासाठी ती गोष्ट चांगली ठरणार नाही, असं गोवा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी सांगितलं.