बळीराजाला दिलासा! देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

| Updated on: Jun 19, 2024 | 10:36 PM

केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी एमएसपी (किमान आधारभूत किंमत) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयात एकूण 14 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

बळीराजाला दिलासा! देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय
देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील सरकारची दुसरी कॅबिनेट बैठक बुधवारी (19 जून) पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांपैकी एक महत्त्वाचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला. केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाच्या माध्यमातून केंद्रात मोदींच्या नेतृत्वातील सत्ता स्थापन झाल्याचं जणू गिफ्टच दिल्याचं मानलं जात आहे. केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी एमएसपी (किमान आधारभूत किंमत) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयात एकूण 14 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये कापसाच्या पिकापासून, मूंग डाळ, उडिदाची डाळ, शेगदाणे, मक्का यांचादेखील समावेश आहे. केंद्रीय सूचना-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे. तांदळाच्या नवीन एमएसपी 2,300 रुपये निश्चित करण्यात आला आहे, जो मागील एमएसपीपेक्षा 117 रुपये अधिक आहे. कापसाचा नवीन एमएसपी 7,121 असेल. त्याच्या दुसऱ्या प्रकारासाठी नवीन एमएसपी 7,521 रुपये असेल, जो पूर्वीपेक्षा 501 रुपये अधिक आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

“एमएसपी वाढल्याने सरकारचा खर्च सुमारे 2 लाख कोटी रुपयांनी वाढेल. यासोबतच महाराष्ट्रातील डहाणू तालुका (पालघर) येथील डीप ड्राफ्ट ग्रीनफिल्ड पोर्टला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 76 हजार 220 कोटी रुपयांच्या वाधवन बंदराला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे”, अशी देखील माहिती अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली.

कोणत्या पिकाला किती एमएसपी?

  • तांदळाला 2300 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर ठरवण्यात आला आहे. गेल्यावर्षापेक्षा यावर्षी तांदळाच्या एमएसपीत 117 रुपयांनी वाढ झाली आहे.
  • तूर डाळीसाठी 7550 रुपये प्रति क्विंटल अशी एमएसपी ठरवण्यात आली आहे. गेल्यावर्षी हा दर 550 रुपये प्रति क्विंटल इतका होता.
  • उडीदाच्या डाळीसाठी 7400 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी ठरवण्यात आला आहे. गेल्यावर्षापेक्षा यावर्षाचा एमएसपी हा 450 रुपयांनी वाढला आहे.
  • मूंगच्या डाळीसाठी प्रति क्विंटल 8682 रुपये असा एमएसपी ठरवण्यात आला आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी मूंगच्या डाळीच्या भावात प्रति क्विंटल 124 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
  • शेंगदाणेसाठी एमएसपी 6783 रुपये प्रति क्विंटल इतका ठरवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी प्रति क्विंटल 406 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
  • केंद्र सरकारने कापसासाठी 7121 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी ठरवला आहे. हा दर गेल्या वर्षापेक्षा 501 रुपयांनी वाढवण्यात आला आहे.
  • ज्वारीसाठी 3371 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी ठरवण्यात आला आहे. हा दर गेल्यावर्षापेक्षा प्रति क्विंटल 191 रुपयांनी जास्त आहे.
  • केंद्र सरकारने बाजरीसाठी 2625 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर ठरवला आहे. हा दर गेल्यावर्षापेक्षा प्रत्येक क्विंटलमागे 125 रुपयांनी वाढवण्यात आला आहे.
  • केंद्र सरकारने मक्कासाठी 2225 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर ठरवला आहे. हा दर गेल्यावर्षापेक्षा प्रत्येक क्विंटलमागे 135 रुपयांनी वाढवण्यात आला आहे.
  • नाचणीचा एमएसपी 4290 रुपये प्रति क्विंटरल ठरण्यात आला आहे.
  • तीळचा एमएसपी 8717 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी ठरवण्यात आला आहे.
  • सूर्यफूलासाठी 7230 रुपये प्रति क्विंटल इतका इमएसपी ठरवण्यात आला आहे.