सम्मेद शिखरस्थळ वादात केंद्राचा अखेर हस्तक्षेप, राज ठाकरे यांनी ही केली होती मागणी

| Updated on: Jan 05, 2023 | 10:03 PM

सम्मेद शिखरजी प्रकरणात अखेर केंद्र सरकारने हस्तक्षेप करत राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. जैन समाजाचे या निर्णयाच्या विरोधात देशभरात उपोषण सुरु होतं.

सम्मेद शिखरस्थळ वादात केंद्राचा अखेर हस्तक्षेप, राज ठाकरे यांनी ही केली होती मागणी
Follow us on

नवी दिल्ली : सम्मेद शिखरजीवरुन ( sammed shikharji ) वाद सुरु असताना आता केंद्र सरकारने ( Central Government ) या प्रकरणात हस्तक्षेप करत मोठा निर्णय घेतला आहे. जैन समाजातील ( Jain community ) लोकांकडून आंदोलन सुरु असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. समेद शिखराला पर्यटन स्थळ बनवण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने तात्काळ स्थगिती दिलीये. याबाबत एक समिती नेमली असून झारखंड सरकारला या मुद्द्यावर आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. समेद शिखरला पर्यटन स्थळ बनवण्याच्या निर्णयामुळे जैन समाज प्रचंड संतापला होता. ( Central Ministry stays all tourism activities at Sammed Shikharji in Jharkhand )

समितीमध्ये जैन समाजातील ( Jain Community ) दोन सदस्यांचा समावेश करण्याच्या सूचना ही केंद्राने राज्य सरकारला दिले आहेत. याशिवाय स्थानिक आदिवासी समाजातून एका सदस्याचा देखील समावेश करण्याच्या सूचना आहेत. 2019 च्या अधिसूचनेतील कलम 3 मधील तरतुदींना स्थगिती देण्याचे आदेशही केंद्राने राज्याला दिले आहेत.

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव ( Bhupendra Yadav ) यांनी जैन समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठकी घेतली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सम्मेद शिखराचे पावित्र्य राखण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचं ही केंद्रीय मंत्र्यांनी जैन समाजाच्या लोकांना दिली होती.

देशाच्या लोकसंख्येमध्ये ०.४ टक्के वाटा असलेला जैन समुदाय झारखंड सरकारच्या त्या निर्णयामुळे संतप्त झाला होता. ज्यामुळे त्यांचं आंदोलन सुरु होतं.

झारखंडमध्येच नव्हे तर दिल्ली, जयपूर आणि भोपाळमध्येही जैन समाजाकडून निदर्शने करण्यात आली. जयपूरमध्ये उपोषणाला बसलेल्या एका जैन साधूचेही निधन झाले होते. ७२ वर्षांचे सुग्यसागर महाराज उपोषणाला बसले होते.२५ डिसेंबरपासून त्यांनी काहीही खाल्ले नव्हते, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

सम्मेद शिखर हे जैन धर्माचे तीर्थक्षेत्र झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ टेकडीवर वसलेले आहे. या टेकडीला जैनांचे 23 वे तीर्थंकर पारसनाथ यांचे नाव देण्यात आले आहे. असे मानले जाते की जैन धर्मातील 24 पैकी 20 तीर्थंकरांनी येथे निर्वाण प्राप्त केले. जैन धर्मीयांसाठी हे सर्वात पवित्र स्थान मानले जाते.

या स्थळावर पोहोचण्यासाठी सुमारे 27 किलोमीटरचा प्रवास पायीच पूर्ण करावा लागतो. ऑगस्ट 2019 मध्ये, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने समेद शिखर आणि पारसनाथ टेकडी इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केली होती. नंतर झारखंड सरकारने याला पर्यटन स्थळ घोषित केले.आता या तीर्थक्षेत्राचे पर्यटनस्थळ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण जैन समाजाचा याला आक्षेप होता. हे पवित्र श्रद्धास्थान असून त्यामुळे येथील पावित्र्य टिकणार नाही असे त्यांचे म्हणणे होते.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी देखील या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. हे प्रेक्षणीय स्थळ बनवल्याने येथे दारू आणि मांसाचे सेवनही होईल. अशी भीती जैन समाजाला होती. अखेर केंद्र सरकारने राज्य सरकारच्या या निर्णयात हस्तक्षेप करत त्याला स्थगिती दिली आहे.