Lok Sabha Election 2024 : ‘या’ मुद्द्यावर तापलंय गोव्याचं राजकारण, कुणाचा कुणावर हल्लाबोल?

| Updated on: Apr 20, 2024 | 12:16 PM

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. रॅली, भेटीगाठी आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गोव्याची भूमीही आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणाने तापली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत रोजगाराचा मुद्दा लावून धरला आहे. तर भाजप विकासाच्या मुद्द्यावर मते मागताना दिसत आहे.

Lok Sabha Election 2024 : या मुद्द्यावर तापलंय गोव्याचं राजकारण, कुणाचा कुणावर हल्लाबोल?
bjp, congress
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

देशभरात लोकसभा निवडणुकीचं रण तापलेलं असताना गोव्यातही प्रचाराचा आणि आरोपप्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. उत्तर गोवा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री श्रीपद नाईक निवडणूक लढवत आहेत. नाईक या मतदारसंघातून पाचवेळा निवडून आलेले आहेत. त्यांचा मुकाबला माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते रमाकांत खलप यांच्याशी आहे. त्यामुळे जसजशी निवडणूक येत आहे, तसं तसं राजकारण तापलं आहे. या निवडणुकीत काँग्रेसने बेरोजगारीचा मुद्दा उचलला असून श्रीपाद नाईकच नव्हे तर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचीही अडचण निर्माण केली आहे. नाईक यांनी एमओपीएम विमानतळावर नोकरी देण्याचं पेरनेम येथील स्थानिकांना आश्वासन दिलं होतं. पण केंद्रात आणि राज्यात सरकार असूनही हे आश्वासन कसं पूर्ण केलं नाही, याकडे काँग्रेसने लक्ष वेधलं आहे.

पेरनेमचे तरुण एमओपीए विमानतळ सुरू झाल्याने उत्साहित होते. आपल्याला नोकऱ्या मिळेल. या ठिकाणी रोजगाराची संधी मिळेल असं त्यांना वाटत होतं. पण आता ही आशा मावळताना दिसत आहे. कारण जी आश्वासने देण्यात आली होती, ती पूर्ण झालेली नाही. केंद्र आणि राज्यात सरकार असूनही भाजपला हे आश्वासन पूर्ण करता आलं नाही, असं काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांकडून पक्षपात

यावेळी रमाकांत खलप यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला आहे. सावंत यांनी आपल्या संकेलिम मतदारसंघाबाबत पक्षपात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा चिंतेचा विषय आहे. एमओपीए विमानतळाजवळ स्थानिक लोकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण मुख्यमंत्री सावंत हे संकेलिमच्या लोकांसोबत पक्षपात करत असल्याचं दिसत आहे, असा आरोप खलप यांनी केला.स्थानिक लोकांच्या एका गटाने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे पेडणेकरांच्या मागण्या मंजूर करण्याची मागणई केली होती. पण पेडणेकरांच्या हाती अजूनही निराशाच आलेली आहे.

खलप पराभूत करूच शकत नाही

पेडणेकरांनी नुकताच नाईक यांना घेराव घातला होता. आता त्यांचा राग मतदानातून व्यक्त होईल, असा दावा खलप यांनी केला. तर श्रीपाद नाइक यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खलप आपल्याला पराभूत करू शकत नाही. कारण 1999मध्येही ते अपयशी ठरले होते. ती माझी पहिलीच निवडणूक होती. त्यावेळी खलप केंद्रीय मंत्री होते. तरीही ते मला पराभूत करू शकले नाही. आताही यशस्वी होणार नाहीत, असं नाईक म्हणाले. एकीकडे काँग्रेस स्थानिकांच्या रोजगाराला निवडणुकीचा मुद्दा बनवत आहे तर दुसरीकडे भाजप विकाच्या मुद्द्यावर मतदान मागत आहे. त्यामुळे आता जनता कुणाच्यासोबत आहे हे येत्या 4 जून रोजीच कळेल.