उत्तरेत उन्हाचा तडाखा तर दक्षिणेत पाऊस, IMD ची मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट

| Updated on: May 21, 2024 | 7:55 PM

देशात अनेक ठिकाणी उष्ण हमामानामुळे नागरिक हैराण आहेत. यामुळे अनेक ठिकाणी घराच्या बाहेर पडणं देखील कठीण झाले आहे. तापमान वाढत असल्याने अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयएमडीने मान्सून बाबत नवीन अपडेट जारी केली आहे.

उत्तरेत उन्हाचा तडाखा तर दक्षिणेत पाऊस, IMD ची मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट
Follow us on

संपूर्ण उत्तर भारतात सध्या उष्णाचा तडाखा बसत आहे. दिल्ली, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. सकाळपासूनच नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. दिवसा बाहेर पडणाऱ्या लोकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय. हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत आणखी उन्हाचा सामना करावा लागू शकतो. शुक्रवारपर्यंत तापमान चढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात एकीकडे उष्णता वाढत असताना दक्षिण भारतात मात्र हवामान बदलले आहे. अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. यादरम्यान, IMD ने मान्सून संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे.

केरळमध्ये पाऊस

केरळमध्ये मंगळवारी हवामान अचानक बदलले. अनेक भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून मोठा दिलासा मिळालाय. हवामान खात्याच्या माहितीनुसार, केरळ व्यतिरिक्त तामिळनाडू, पुद्दुचेरी, लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्येही हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत या राज्यांमध्ये ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि रायलसीमा येथे पुढील पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. यंदा मान्सून वेगाने पुढे येत आहे. त्यामुळे वेळेआधीच मान्सुन हजेरी लावणार आहे.

उत्तर भारतात भीषण उष्णतेची लाट

भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, 24 मे पर्यंत दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशच्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात आणि उत्तर-पूर्व मध्य प्रदेश, बिहारमध्ये २४ मेपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 21 ते 23 मे दरम्यान उष्ण वाऱ्यांचा प्रभाव ओडिशातही दिसून येईल. कोकण आणि गोवा, बिहार, झारखंडसह अनेक ठिकाणी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये उष्णतेमुळे स्थिती बिकट

गेल्या २४ तासांत जोधपूर, बिकानेर, जयपूर, भरतपूर आणि कोटा येथील विविध भागात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. पिलानी येथे २४ तासांत कमाल तापमान ४६.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. येत्या ४८ तासांत कमाल तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेची लाट कायम राहणार आहे. याबाबत रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलाय.

हवामान खात्याचे म्हणणे आहे की दक्षिण द्वीपकल्पीय भारतात 23 तारखेपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून पुढील ४८ तासांत दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटांवर सरकण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, 22 मे च्या सुमारास दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

मान्सूनबाबत अपडेट काय आहे?

IMD नुसार, पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सूनचा प्रभाव दक्षिण-पूर्व अरबी समुद्राच्या काही भागात आणि मालदीवच्या काही भागांमध्ये दिसू शकतो. दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटांच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.