India Air Defence System : हिज्बुल्लाहसारखे पाकिस्तानने एकाचवेळी हजारो रॉकेट डागले तर भारताची तयारी काय?

| Updated on: Sep 30, 2024 | 11:33 AM

India Air Defence System : भारताला चीन आणि पाकिस्तानचा शेजार लाभला आहे. या दोन्ही देशांबरोबर भारताने युद्ध लढलं आहे. हे दोन्ही देश कुरापतखोर स्वभावाचे आहेत. भारताला त्रास देणं, अस्थिर करणं हा त्यांचा अजेंडा असतो. दहशतवाद व अन्य मार्गाने भारतावर या देशांनी अनेकदा वार केला आहे. चीन-पाकिस्तान भरोशाचे शेजारी नाही. उद्या त्यांनी हमास किंवा हिज्बुल्लाह सारखा हल्ला केला, एकाचवेळी हजारो रॉकेट्स डागले तर भारताची तयारी काय आहे? आपण त्यांचा रॉकेट हल्ला परतवून लावण्यासाठी सक्षम आहोत का? आपली तयारी काय आहे? ते जाणून घ्या.

India Air Defence System : हिज्बुल्लाहसारखे पाकिस्तानने एकाचवेळी हजारो रॉकेट डागले तर भारताची तयारी काय?
S-400
Image Credit source: PBNS File Photo
Follow us on

प्रत्येक युद्धाची दोन प्रमुख कारण असतात जमीन आणि धर्म. तलवारी, भाल्यापासून ते आताच्या काळात अत्याधुनिक रॉकेट, रायफलने लढल्या जाणाऱ्या युद्घामागे सुद्धा हेच कारण आहे. रशिया-युक्रेन युद्धामागे जमीन एक प्रमुख कारण आहे. युक्रेन नोटा समूहात सहभागी झाल्यास रणनितीक दृष्टीने रशियाला धोका निर्माण होईल, म्हणून रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्धाचा निर्णय घेतला. युक्रेनमधील रशियासाठी रणनितीक दृष्टीने सोयीची ठरणारी ठिकाणं त्यांनी ताब्यात घेतली. इस्रायल-हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धामागे धर्म आणि प्रादेशिक विस्तार हे प्रमुख कारण आहे. आज 21 व्या शतकात अनेक देशांची विस्ताराची महत्त्वकांक्षा युद्धाला कारण ठरत आहे. उदहारणार्थ चीन. जमीन, धर्माबरोबर 21 व्या शतकात युद्धाच आणखी एक कारण म्हणजे तेल. रासायनिक शस्त्रांच्या नावाखाली अमेरिकेने इराकवर केलेलं आक्रमण हे त्याच एक उदहारण आहे.

सध्याच्या काळात युद्धाची व्याख्या बदलली आहे. आज युद्ध फक्त रणांगणावर लढलं जात नाही. जमीन, पाणी, हवा या बरोबर माणासने अवकाशातून सुद्धा युद्ध लढण्याची क्षमता प्राप्त केली आहे. सायबर वॉरफेअर हे आधुनिक काळातीतल टेक्नोलॉजी वॉर आहे. त्या माध्यमातून तुम्ही एखाद्या देशाचे आर्थिक व्यवहार ठप्प करु शकता. दोन आठवड्यांपूर्वी इस्रायलने पेजर, वॉकी-टॉकी ब्लास्टच्या माध्यमातून युद्धाच एक नवीन स्वरुप दाखवलं. म्हणजे तुमच्या खिशात असलेला छोट्सा मोबाईलही तुमच्या मृत्यूला कारण ठरु शकतो. आजचा आपला विषय हा एअर डिफेन्स सिस्टिमचा आहे. मागच्यावर्षी गाजा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हजारो रॉकेट डागले, शुक्रवारी हिज्बुल्लाह चीफ हसन नसरल्लाहला संपवण्याआधी लेबनानमधून इस्रायलवर असाच हजारो रॉकेट्सनी हल्ला करण्यात आला. इस्रायलकडे आर्यन डोम सारखं सुरक्षा कवच असल्यामुळे त्यांचं फार नुकसान झालं नाही. पण, समजा उद्या पाकिस्तानने आपल्यावर एकाचवेळी अशी हजारो रॉकेट डागली तर? आपल्याकडे असा हल्ला परतवून लावण्यासाठी इस्रायल सारख भक्कम सुरक्षा कवच आहे का?

भारताकडे किती प्रकारची एअर डिफेन्स सिस्टिम आहे? ती कशा प्रकारे काम करते, त्यांची रेंज काय आहे? जाणून घेऊया भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिम कार्यक्रमाबद्दल.

भारताकडे वेगवेगळ्या रेंजची एअर डिफेन्स सिस्टिम आहे.

पहिला – लॉन्ग रेंज इंटरसेप्शन म्हणजे इंडियन बॅलेस्टिक मिसाइल डिफेन्स प्रोग्रॅम.

दुसरा- इंटरमीडिएट इंटरसेप्शन म्हणजे S-400 ट्रिम्फ एअर डिफेन्स सिस्टिम. 

तिसरा- शॉर्ट रेंज इंटरसेप्शन म्हणजे आकाश एअर डिफेंस सिस्टिम

चौथा – वेरी शॉर्ट रेंज इंटरसेप्शन म्हणजे मॅनपॅड्स आणि अँटी-एअरक्राफ्ट गन्स. 

इंडियन बॅलेस्टिक मिसाइल डिफेन्स प्रोग्रॅम 

या प्रोग्रॅम अंतर्गत वेगवेगळ्या रेंजच्या बॅलेस्टिक मिसाइल्सपासून बचाव करण्यासाठी डिफेन्स सिस्टिम बनवण्यात आली आहे. यासाठी टू लेयर इंटरसेप्टर मिसाइल्स बनवण्यात आली आहेत.

पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टिम (PAD) यामध्ये इंटरसेप्टर मिसाइल एका ठराविक उंचीवर जाऊन शत्रुने डागलेलं मिसाइल हवेतच नष्ट करु शकतं.

दुसरी आहे, एडवांस्ड एअर डिफेन्स सिस्टिम (AAD) यामध्ये इंटरसेप्टर मिसाइल्स कमी उंचीवरुन येणाऱ्या टार्गेट्सना नष्ट करु शकतं.

ही मिसाइल सिस्टिम 5 हजार किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त दूर अंतरावरुन येणाऱ्या हवाई ऑब्जेक्टला हवेतच संपवून टाकते. भारताला नेहमीच चीन आणि पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाइल्सपासून धोका आहे. PAD म्हणजे पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टिममधील मिसाइल्सची रेंज 300 ते 2000 किलोमीटर आहे. जमिनीपासून 80 किलोमीटर वर शत्रुच्या टार्गेटला नष्ट करु शकतात. ही इंटरसेप्टर मिसाइल्स 6174 km/hr च्या वेगाने शत्रुकडे झेपावतं. यात पृथ्वी सीरीजमधील सगळीच मिसाइल्स आहेत.

एडवांस्ड एअर डिफेंस म्हणजे AAD बद्दल बोलायच झाल्यास ही सिस्टिम 30 किलोमीटर उंचीवरील टार्गेट नष्ट करु शकते. यांची ऑपरेशनल रेंज 150 ते 200 किलोमीटर आहे. ही इंटरसेप्टर मिसाइल्स 5556 km/hr च्या स्पीडने शत्रुकडे झेपावतं.

भारताकडे असलेली घातक एअर डिफेन्स सिस्टिम कुठली?

S-400 ट्रिम्फ एअर डिफेन्स सिस्टिम ही भारताने रशियाकडून विकत घेतलेली सिस्टिम आहे. S-400 मधून एकाचवेळी 72 मिसाइल्स डागता येतात. या एअर डिफेन्स सिस्टिमला एकाजागेवरुन दुसऱ्या जागी हलवणं खूप सोपं आहे. 8X8 च्या ट्रकवर ही सिस्टिम फिट करता येऊ शकते. मायनस 50 डिग्री ते मायनस 70 डिग्री तापमान ही सिस्टिम काम करु शकते. S-400 ही भारताकडे असलेली सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे. या सिस्टिमचे रडार पावरफुल आहेत. शत्रुची फायटर विमान, ड्रोन्स, क्रूज आणि बॅलेस्टिक मिसाइल्स शोधून टार्गेटवर पोहोचण्याआधीच हवेतच नष्ट करण्याची क्षमता आहे.

काही सैन्य अभ्यासकांचा असा दावा आहे की, ट्रायम्फची नेबो-एम रडार प्रणाली इतकी शक्तिशाली आहे, की पाचव्या पिढीची स्टेल्थ फायटर जेट्स सुद्धा यातून सुटणार नाही. F-35, F-22 ही अमेरिकेची लेटेस्ट पाचव्या पिढीची स्टेल्थ विमानं आहेत. रडारला चकवण्याची त्यांची क्षमता आहे. पण S-400 सिस्टिम त्यांना सुद्धा पकडू शकते. त्यामुळे रशियाकडून ही सिस्टिम विकत घेतल्यास निर्बंध घालण्याची धमकी अमेरिकेकडून देण्यात येत होती.

S-400 किती प्रकारची मिसाइल?

S-400 मिसाइल सिस्टिममध्ये चार प्रकारची मिसाइल्स आहेत. यांची रेंज 40, 100, 200 आणि 400 km पर्यंत आहे. ही सिस्टिम 100 ते 40 हजार फुट उंचीवरुन उडणारं टार्गेट ओळखून नष्ट करु शकते. एस-400 मिसाइल सिस्टिमच राडार खूप पावरफुल आहे. हे रडार 600 km च्या रेंजमध्ये एकाचवेळी जवळपास 300 टारगेट ट्रॅक करु शकतं.

पेचोरा किती घातक आहे ही सिस्टिम

पेचोरा ही जमिनीवरुन हवेत मारा करणारी मिसाइल आहे. भारताकडे याचे 30 स्क्वॉड्रन्स आहेत. वेगवेगळ्या सीमांवर सुरक्षेसाठी पेचोरा सिस्टिम तैनात आहे. याचे 12 वेरिएंट्स आहेत. जगातील 31 देश ही सिस्टिम वापरत आहेत. या सिस्टिममधील मिसाइलच वजन 953 kg आहे. या मिसाइलच्या नाकावर 60 kg फ्रॅगमेंटेड हाय एक्सप्लोसिव शस्त्र आहे. याची ऑपरेशनल रेंज 3.5 से 35 km आहे. जास्तीत जास्त 59 हजार फुट उंचीवर हे मिसाइल जाऊ शकतं. या सिस्टिमचा स्पीड 3704 ते 4322 km/hr आहे. पेचोरा मिसाइल सिस्टिमच वैशिष्टय म्हणजे कमी उंचीवरुन उड्डाण करणाऱ्या टार्गेटला नष्ट करण्याची ताकद. या सिस्टिमच्या रडारव्दारे 32 ते 250 किलोमीटरच्या रेंजमधील शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येते. ही मिसाइल सिस्टिम जुन्या टेक्निकवर काम करते. रेडियो कमांड गायडन्स सिस्टिम. कुठलही अत्याधुनिक विमान सर्वकाही बंद करु शकतं. पण रेडिओ बंद करत नाही. शत्रुच्या विमान, हेलिकॉप्टरने रेडिओ बंद केला नाही, तर हे मिसाइल लोकेशन शोधून टार्गेटला उद्धवस्त करु शकतं.

स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिम कुठली?

आकाश मिसाइल सिस्टिमच्या सिंगल युनिटमध्ये चार वेगवेगळी क्षेपणास्त्र आहेत. ही क्षेपणास्त्र वेगवेगळी टार्गेट्स उद्धवस्त करु शकतात. सध्या भारताकडे आकाशचे 3 वेरिएंट्स आहेत. पहिलं आकाश MK- याची रेंज 30 KM आहे. दुसरं MK-2 याची रेंजी 40 KM आहे. तिसरं NG याची रेंज 80 KM आहे. आकाश NG 20 किमी उंचीवर जाऊन शत्रुच विमान किंवा मिसाइल नष्ट करु शकतं.

याचा वेग 3087 km/hr आहे. आकाश NG मध्ये डुअल पल्स सॉलिड रॉकेट मोटर आहे. त्यामुळे वेग वाढतो. याची रेंज 40 ते 80 km आहे. सोबतच यामध्ये एक्टिव इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ऐरे मल्टी फंक्शन राडार आहे. एकाचवेळी शत्रुची अनेक विमानं आणि मिसाइल्सची या द्वारे माहिती मिळू शकते.

आकाश NG च वजन 720 kg आहे. याची लांबी 19 फुट आणि व्यास 1.16 फुट आहे. हे क्षेपणास्त्र आपल्यासोबत 60 kg वजन वाहून नेऊ शकतं. आकाश-एनजी मिसाइल सिस्टिम चीन सोबत झालेल्या सीमा वादानंतर लडाख येथे (LAC) वर तैनात केलं होतं.

Samar Air defence system

स्पायडर सिस्टिम

अन्य एअर डिफेन्स सिस्टिमच्या तुलनेत स्पायडर ही हलकी, घातक आणि अचूक हल्ला करणारी सिस्टिम आहे. सीमेजवळ तैनात केल्यास शत्रुचा हवाई हल्ला वाया जाऊ शकतो. या मिसाइलद्वारे तुम्ही एअरक्राफ्ट, फायटर जेट, हेलिकॉप्टर, ड्रोन्स, प्रेसिशन गाइडेड मिसाइल्स पाडू शकता. स्पायडरचे दोन वेरिएंट्स आहेत. एक स्पायडर-SR म्हणजे शॉर्ट रेंज. दुसरी स्पायडर-MR म्हणजे मीडियम रेंज. दोन्ही सिस्टिम प्रत्येक सीजनमध्ये काम करतात.

भारताकडे आयरन डोमसारखी कुठली मिसाइल यंत्रणा?

भारताने LRSAM मिसाइल सिस्टिम बनवली आहे. याला बराक 8 सुद्धा म्हटलं जातं. भारत आणि इस्रायलने मिळून ही सिस्टिम बनवली आहे. ही 400 किलोमीटर रेंज असलेली स्वदेशी सरफेस-टू-एयर मिसाइल सिस्टिम आहे. शत्रुची फायटर विमानं, रॉकेट, हेलिकॉप्टर या मिसाइलद्वारे पाडता येऊ शकतात. 350 ते 400 किलोमीटर रेंजमध्ये टार्गेटला हवेतच नष्ट करता येतं. सध्या 70 किलोमीटर रेंजमधील इंटरसेप्टर मिसाइल बनवण्यात आलय. इस्रायलच्या आयरन डोम सारखी ही मिसाइल प्रणाली आहे. जास्तीत जास्त 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे मिसाइल जातं.

भारत-इस्रायलच्या सीमांमध्ये फरक काय?

म्हणजे उद्या भारतावर इस्रायल सारखा हल्ला झाला, तर स्वसंरक्षणाची भारताची तयारी आहे. महत्त्वाच म्हणजे यावर सतत अपग्रेडेशनच काम सुरु आहे. भारत इस्रायलसारखी अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम विकसित करण्यावर काम करत आहे. भारताच्या तुलनेत इस्रायल खूप छोटा देश आहे. भारताला आपल्या सर्व सीमांच्या संरक्षणासाठी अजून भक्कम तयारी करावी लागेल.