मालदीवच्या एका चुकीने अर्थव्यवस्थेला फटका, पर्यटनासाठी भारतीयांनी निवडला हा देश

| Updated on: May 19, 2024 | 10:03 AM

India Maldives Tension: मालदीवची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यामध्ये भारतीय पर्यटकांनी सर्वाधिक योगदान दिले आहे. 2021 आणि 2022 मध्ये भारत हे मालदीवचे सर्वात मोठे पर्यटन केंद्र राहिले. तेथे जाणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी 23% एकट्या भारताचे योगदान होते.

मालदीवच्या एका चुकीने अर्थव्यवस्थेला फटका, पर्यटनासाठी भारतीयांनी निवडला हा देश
Follow us on

India Maldives Tension: भारत आणि मालदीव यांच्यात निर्माण झालेला तणाव अजूनही कमी झाला नाही. मालदीवच्या मागणीनंतर भारतीय सैन्य त्या देशातून परत आले. त्यानंतर मालदीवकडे विमान आणि हेलिकॉप्टर चालवण्यासाठी प्रशिक्षित पालयट नसल्याची कबुली त्या देशातील संरक्षणमंत्र्यांनी दिली. दोन्ही देशातील तणावामुळे भारतीय पर्यटकांनी “बायकॉट मालदीव” ही मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे मालदीवमधील पर्यटन उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. भारत आणि मालदीव यांच्यातील तणावामुळे श्रीलंकेचा फायदा झाला आहे. भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकल्याचा परिणाम म्हणून श्रीलंकेच्या पर्यटन उद्योग वाढला आहे, असे श्रीलंकेचे पर्यटन मंत्री हरिन फर्नांडो यांनी म्हटले आहे. ‘सीएनबीसी’शी बोलताना फर्नांडो म्हणाले की, भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीचा फायदा श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्राला फायदा झाला आहे.

असे वाढत गेले पर्यटन

श्रीलंकेत गेल्या वर्षी 2023 मधील जानेवारी महिन्यात 13,759 भारतीय पर्यटकांनी भेट दिली होती. परंतु यावर्षी मालदीव ऐवजी श्रीलंकेत भारतीय पर्यटक येत आहे. यामुळे या वर्षी जानेवारीमध्ये श्रीलंकेतील भारतीय पर्यटकांची संख्या 34,399 झाली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 13,714 लोक श्रीलंकेला गेले होते, तर यावर्षी ही संख्या 30,027 झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या वर्षी मार्चमध्ये 18,959 च्या तुलनेत यावेळी 31,853 भारतीयांनी श्रीलंकेला भेट दिली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 19,915 लोकांनी श्रीलंकेला भेट दिली होती, तर यावर्षी 27,304 भारतीयांनी श्रीलंकेला भेट दिली आहे.

चार महिन्यात असा झाला बदल

भारतासोबतचा पंगा मालदीवला चांगलाच महागात पडला. मालदीवमध्ये सुट्टी घालवणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या आता निम्म्यावर आली आहे. यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत 42,638 भारतीय पर्यटक मालदीवमध्ये पोहोचले. तर गेल्या वर्षी याच चार महिन्यांत 73,785 भारतीय पर्यटक तेथे पोहोचले होते. आकडेवारीनुसार, यावर्षी 15,006 भारतीय पर्यटक मालदीवला गेले, फेब्रुवारीमध्ये 11,252, मार्चमध्ये 7,668 आणि एप्रिलमध्ये 8,712 पर्यटक गेले.

हे सुद्धा वाचा

मालदीवला फटका बसला

मालदीवची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यामध्ये भारतीय पर्यटकांनी सर्वाधिक योगदान दिले आहे. 2021 आणि 2022 मध्ये भारत हे मालदीवचे सर्वात मोठे पर्यटन केंद्र राहिले. तेथे जाणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी 23% एकट्या भारताचे योगदान होते. 2021 मध्ये 2.9 लाख पर्यटक आणि 2022 मध्ये 2.4 लाख पर्यटक तिथे गेले होते. 2023 च्या आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या वर्षी देखील 2.9 लाख भारतीय पर्यटक सुट्टीसाठी मालदीवमध्ये गेले होते. पण जेव्हापासून मालदीवचे भारताशी संबंध बिघडले, तेव्हापासून मालदीवमध्ये जाणारे पर्यटक कमी झाले आहे.