India-China : ‘या’ देशाच्या मध्यस्थीमुळे LAC वर चीनच एक पाऊल मागे, जिनपिंग भारतासमोर झुकले

| Updated on: Oct 22, 2024 | 12:23 PM

India-China : मागच्या चार वर्षांपासून LAC वर भारत आणि चीनचं सैन्य आमने-सामने आहे. पण आता दोन्ही देशांमध्ये एक करार झालाय. मागच्या काही वर्षांपासून अडून बसलेला चीन आता एक पाऊल मागे का गेला? यामागे आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे? जाणून घ्या.

India-China : या देशाच्या मध्यस्थीमुळे LAC वर चीनच एक पाऊल मागे, जिनपिंग भारतासमोर झुकले
India-China
Follow us on

रशियाच्या कजानमध्ये होणाऱ्या ब्रिक्स समिटआधी भारत आणि चीनमध्ये बॉर्डर एग्रीमेंट झालं आहे. दोन्ही देशांमध्ये LAC वर पेट्रोलिंग संदर्भात एकमत झालय. पीएम मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या संभाव्य भेटीआधी ही घडामोड झाली आहे. लडाखमध्ये दोन्ही देशांच सैन्य आमने-सामने आहे. त्याआधी उचलण्यात आलेल हे पाऊल एक चांगली बाब आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराची माहिती दिलीय. 2020 साली दोन्ही देशांमध्ये LAC वर पेट्रोलिंगची जी स्थिती होती, तीच स्थिती कायम होणार आहे, असं जयशंकर म्हणाले. यामुळे मागच्या दोन वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होईल.

जाणकारांच्या मते, दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार घडवून आणण्यामागे रशियाची भूमिका महत्त्वाची आहे. सध्या भारत आणि कॅनडामध्ये तणाव टोकाला पोहोचला आहे. कॅनडाचे चार मित्र अमेरिका, न्यूझीलँड, यूके आणि ऑस्ट्रेलिया त्यांच्यासोबत आहेत. हे सर्व देश Five Eyes चे सदस्य आहेत. दुसऱ्या बाजूला ब्रिक्स देश आहे. कजानमध्ये होणाऱ्या या समिटच्या माध्यमातून पुतिन यांना अमेरिका आणि जगाला संदेश द्यायचा आहे. अमेरिकेने कॅनडाची साथ देऊन त्यांच्यासाठी कोण जास्त जवळचा आहे ते दाखवून दिलय. दुसऱ्याबाजूला रशियाने नेहमीच भारताची साथ दिलीय. आपल्या दोन मित्रांनी आपसात भांडू नये, ही रशियाची इच्छा आहे.

अजित डोवाल बैठकीत काय म्हणालेले?

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यानुसार, अलीकडे भारत आणि चीनच्या मंत्र्यांमध्ये बैठकीच्या अनेक फेऱ्या झाल्या. भारत आणि चीनचे राजनैतिक तसेच सैन्य अधिकारी मागच्या अनेक आठवड्यांपासून वेगवेगळ्या मंचावरुन परस्परांच्या संपर्कात होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सप्टेंबर महिन्यात रशियाला गेले होते. त्यावेळी चीनचे NSA आणि परराष्ट्र मंत्री तिथे होते. अजित डोवाल यांची चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांच्याबरोबर भेट झाली. डोवाल आणि वांग यांनी रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात चर्चा केली होती.

द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यासाठी सीमाभागात शांतता, स्थिरता आणि LAC चा सम्मान करणं आवश्यक आहे असं डोवाल वांग यांना म्हणाले होते. रशियाने भारत आणि चीनला एका टेबलावर आणण्याचा प्रयत्न केला, त्याची रशियन मीडियामध्ये बरीच चर्चा झाली होती.

असं करण्यामागे स्वार्थ काय?

असं करण्यामागे रशियाचा स्वार्थ आहे. भारत आणि चीनने आपसात भांडावं अशी पुतिन यांची इच्छा नाही. दोन्ही देशांमध्ये तणाव राहिला, तर ब्रिक्स कमजोर होईल. भारत आणि चीनमध्ये असाच तणाव राहिला, तर भारत युरोप-अमेरिकेच्या बाजूने जास्त जाईल, यामध्ये रशियाच नुकसान होतं. ब्रिक्स परिषदेत पीएम मोदी आणि जिनपिंग यांच्यासोबत आपला फोटो काढणं हे व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी जास्त महत्त्वाच आहे. जागतिक मीडियाला या फोटोची प्रतिक्षा आहे.