Indian Railways: भारतीय रेल्वेने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या कोट्यवधी आहे. रेल्वेकडून प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. नवनवीन रेल्वे सुरु केल्या जातात. नवीन मार्ग तयार केले जात आहे. रेल्वेच्या कामकाजासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहात उत्तर दिले. त्यानुसार रेल्वे नाफ्यात आली आहे. रेल्वेकडून प्रवाशांच्या तिकिटांवर मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जाते. परंतु हे नुकसान मालवाहतुकीच्या भाड्यातून निघते. 2023-24 दरम्यान भारतीय रेल्वेचा 2,75,000 कोटी रुपये खर्च झाला. त्या तुलनेत 2,78,000 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
रेल्वेचा होणारा खर्च रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मांडला. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 1,16,000 कोटी रुपये, पेन्शनवर 66,000 कोटी रुपये, विद्युत बिलावर 32,000 कोटी रुपये खर्च होतात. चांगल्या कामगिरीमुळे रेल्वे आपला सर्व खर्च भरून काढत आहे. तसेच प्रवाशांसाठी विविध सुविधा दिल्या जात असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
रेल्वे प्रत्येक तिकिटावर किती अनुदान देते, त्यावर बोलताना रेल्वे मंत्री म्हणाले, रेल्वेचे उत्पन्न मालभाड्यातून निघत आहे. प्रवाशी रेल्वेतून फायदा होत नाही. उलट प्रवाशांच्या तिकिटावर अनुदान दिले जात आहे. रेल्वे प्रत्येक किलोमीटरसाठी 66 पैसे अनुदान देत आहे. रेल्वेला प्रत्येक किलोमीटरसाठी 1.38 रुपये खर्च येतो. परंतु प्रवाशांकडून केवळ 72 पैसे घेतले जात आहे. सन 2023-24 मध्ये प्रवाशांचा अनुदानावर 57,000 कोटी रुपये खर्च झाले आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेचे तिकीट दर शेजारच्या देशांपेक्षा कमी आहे. भारतात 350 किलोमीटरसाठी सामान्य श्रेणीला 121 रुपये तिकीट दर आहे. पाकिस्तानात हे दर 400 रुपये तर श्रीलंकेत 413 रुपये आहे. तसेच रेल्वेने 2020 पासून भाड्यात कोणताही दरवाढ केली नाही. 2019 मध्ये विद्युतीकरण झाल्यामुळे त्यातून इंधनाची बचत 30,000-32,000 कोटी रुपये झाली आहे.
भारतीय रेल्वे 1.6 अब्ज टन मालवाहतूक केली आहे. मालवाहतुकीत भारत जगातील पहिल्या तीन देशांमध्ये आहे. आपल्यापुढे फक्त चीन आणि यूएस आहे. बिहारमधील मधौरा येथे असलेल्या कारखान्यात तयार करण्यात आलेल्या लोकोमोटिव्हची निर्यात लवकरच सुरू होणार आहे, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.