लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांच्या दहा जागांवर राज्यसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या दहा जागांपैकी सात जागा भाजपच्या आहेत. दोन जागा काँग्रेसच्या तर एक जागा आरजेडीची आहे. आता या दहाच्या दहा जागांवर एनडीएचे उमेदवार निवडून येण्याची शक्तता आहे. यामुळे लोकसभेत कमी जागा मिळाल्याचा वचपा राज्यसभेच्या माध्यमातून एनडीए काढणार आहे. या पोटनिवडणुकीनंतर राज्यसभेत एनडीएचे बळ आणखी वाढणार आहे.
राज्यसभेची पोटनिवडणूक ज्या राज्यांमध्ये होणार आहे, त्याठिकाणी एनडीएचे सरकार आहेत. आसाम, बिहार, महाराष्ट्रातील दोन-दोन जागेवर निवडणूक होईल. तर हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्रिपुरामधील एक-एक जागेवर राज्यसभा पोटनिवडणूक होईल. बिहार, महाराष्ट्र आणि आसाममध्ये दोन-दोन जागा रिक्त होणार आहेत. तसेच हरियाणा आणि राजस्थानमधील एक-एक जागा आहे. हरियाणा, राजस्थानमधील जागा काँग्रेसची होती. त्याठिकाणी भाजप उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. कारण या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे बहुमत आहे.
महाराष्ट्र, बिहार आणि आसममध्ये एनडीए सरकार आहे. मध्य प्रदेशात भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. त्रिपुरात भाजप सरकार आहे. बिहारमधील दोन जागांपैकी एक जागा इंडिया आघाडीकडे जाऊ शकते. त्यानंतर एनडीए 10 पैकी 9 जागा जिंकणार असून दोन जागेचा फायदा होणार आहे.
मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य सिंधिया, महाराष्ट्रातून पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले, हरियाणामधून दीपेंद्र हुड्डा, मीसा भारती (बिहार), विवेक ठाकूर (बिहार), कामाख्या प्रसाद तासा (आसाम), सर्बानंद सोनोवाल (आसाम), केसी वेणुगोपाल (राजस्थान) आणि बिप्लब कुमार देब (त्रिपुरा) यांच्या राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत.
महाराष्ट्रात पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांच्या जागांवर निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात महायुतीकडे बहुमत आहे. परंतु विरोधकांनी उमेदवार दिल्यास निवडणूक होऊ शकते. त्यात नाराजांनी महाविकास आघाडीला साथ दिली तर महाराष्ट्रातील गणित एनडीएच्या विरोधात जाऊ शकते.