भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक बोलण्यामुळे प्रसिद्ध आहेत. अनेक वेळा ते आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना खडेबोल सुनावत असतात. कोणाची मुलाहिजा न ठेवता त्यांच्याकडून परिस्थिती सांगितली जाते. आता पुन्हा भाजपच्या कार्यक्रमात त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांचे कान टोचले आहे. गोव्यात पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी म्हणाले, ”आपण तेच काम केले तर आपल्या येण्याचा फायदा काय? आपल्यात आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण काय? भविष्यात काही चांगले करायचे असेल तर भूतकाळातल्या घटना आठवून वर्तमानात त्याचे चिंतन केले पाहिजे.”
आपल्या पक्षात अनुकूल काळ आहे. ज्यावेळी शेतात हायब्रीड बियाणे लागते. तेव्हा उत्पन्न वाढते, पण जेवढे हायब्रीड बियाणे डेव्हलप होते तेवढे झाडावर रोगराई देखील वाढते. वाईट दिवसात आनंद होतो. मात्र चांगल्या दिवसात घर बरबाद होतात. समृद्ध आणि संपन्नतेच्या काळात सुख टिकवणे हे आवश्यक असते. भविष्यातील उद्दिष्ट लक्षात ठेवून सुखी कसा होता येईल हे लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या पक्षात आपले जे संस्कार आहे, ते शॉटकट नाही. लालकृष्ण आडवाणी नेहमी म्हणायचे, “वुई आर पार्टी विथ डिफरन्स” आपण तेच काम केले तर आपल्या येण्याचा फायदा काय. आपले वेगळेपण आपण लक्षात ठेवले पाहिजे. जे काम आपण नाही करायला पाहिजे ते केले तर त्यांच्या जाण्यात फायदा नाही आणि आपल्या येण्यात फायदा नाही.
आपण फायनान्शियल ऑडिट करतो. परंतु परफॉर्मन्स ऑडिट करायला पाहिजे. आम्ही राजकारणी लोक हुशार असतो, दुसऱ्यांना सांगतो तसे स्वतःच्या जीवनात वागतो असे नाही. तुम्ही कसेही वागा, तुमच्या मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही काय करता, कसे वागता, काय केले, काय नाही केले, हे सगळे माहीत आहे. त्या आधारावर ते तुमचे मूल्यांकन करतात. काहीजण म्हणतात की राजकारण आहे,करावे लागते.
महाराष्ट्रात सध्या जातीयवादी खूप सुरू आहेत. मी बावनकुळे आणि फडणवीस यांना म्हटले की, या वादात आपली खूप अडचण होईल. पण मी ठरवून टाकले की कुठलाही व्यक्ती हा जातीने मोठा होत नसतो जातीय वाद समूळ नष्ट केला पाहिजे. माझ्या मतदार संघात 40 टक्के दलित आणि मुस्लिम आहेत, पण मी निवडून येतो.