उद्धव ठाकरे यांची दिल्ली वारी यशस्वी, महाविकास आघाडीत ठाकरेंना मिळाले…विधानसभेचे सूत्रही ठरले

| Updated on: Aug 08, 2024 | 8:02 AM

uddhav thackeray in new delhi: विधानसभा निवडणुकीसाठी तीन पक्षाचा वॉररुम एकच असणार आहे. तसेच एकच अजेंडा घेऊन महाविकास आघाडी जनतेसमोर जाणार आहे. जनतेमध्ये तीन पक्षांत उत्तम एकजूट असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. प्रचारात महाविकास आघाडीतील नेते महत्वाच्या सभांमध्ये एकत्र असणार आहे.

उद्धव ठाकरे यांची दिल्ली वारी यशस्वी, महाविकास आघाडीत ठाकरेंना मिळाले...विधानसभेचे सूत्रही ठरले
उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांसोबत
Follow us on

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात बुधवारी त्यांना मोठे यश मिळाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या. काँग्रेस सोबत झालेल्या बैठकीत येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्या मागणीला यश आल्याचे वृत्त आहे. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहर उद्धव ठाकरे असणार आहे, असा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोण किती जागेवर लढवणार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र लढण्यावर सहमत झाले. त्यानुसार काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या जागा शिवसेनेला मिळणार आहे. तीन नंबरवर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत असा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१५५ जागा सोडून इतर जागांवर चर्चा

विधानसभा निवडणुकीसाठी घटक पक्षांच्या विजयी असलेल्या जागा सोडून इतर जागांवर चर्चा होणार आहे. शिवसेना उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष १५५ जागा सोडून इतर जागांवर चर्चा करतील. जागा कोणाकडे असली तरी उमेदवार देताना जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊनच उमेदवारी दिली जाणार आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी विचारले होते. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही चांगले काम केले आहे. यामुळे तुम्हीच येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार का? असे विचारले होते. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न इतर पक्षांना (काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी) विचारा, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले होते. परंतु आता तेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहेत.

तीन पक्षांचा वॉररुम एकच

विधानसभा निवडणुकीसाठी तीन पक्षाचा वॉररुम एकच असणार आहे. तसेच एकच अजेंडा घेऊन महाविकास आघाडी जनतेसमोर जाणार आहे. जनतेमध्ये तीन पक्षांत उत्तम एकजूट असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. प्रचारात महाविकास आघाडीतील नेते महत्वाच्या सभांमध्ये एकत्र असणार आहे.