चांद्रयान 3 ने चंद्रावर असे काय पाहिले ज्यामुळे सर्वच झाले आश्चर्यचकित?

| Updated on: Jul 04, 2024 | 8:51 PM

Chandrayaan 3 : प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर सुमारे 103 मीटरचे अंतर कापले आहे. यादरम्यान त्याने चंद्राच्या पृष्ठभागाचे अनेक फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत. ज्यामुळे अनेक मोठी माहिती इस्रोच्या हाती लागली आहे. रोव्हरने असे काय पाठवले आहे की, ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

चांद्रयान 3 ने चंद्रावर असे काय पाहिले ज्यामुळे सर्वच झाले आश्चर्यचकित?
Follow us on

भारताने तिसरी चंद्रयान मोहिम यशस्वी करुन इतिहास रचला आहे. या चांद्रयान-3 ला दहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले होते. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील तिसरा देश ठरला. या यशस्वी मोहिमेची घोडदोड अजून सुरुच आहे. वेळोवेळी चंद्राशी संबंधित माहिती समोर येत आहे. आता लँडिंगच्या दहा महिन्यांनंतर आणखी एक आनंदाची बातमी समोर आली. चंद्रावर चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरमधून बाहेर पडलेल्या प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर सुमारे 103 मीटरचा प्रवास पूर्ण केलाय. आता अशी काही माहिती समोर आलीये ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

रोव्हरने पूर्ण केले 103 मीटर अंतर

प्रज्ञान रोव्हरने शिवशक्ती पॉईंटवरून मोठा प्रवास केलाय. चांद्रयान-3 उतरले तेव्हा त्याला लहान खडकांचे तुकडे दिसले होते. काही ठिकाणी उतार तर काही ठिकाणी लहान खड्ड्ये होते. एका चंद्राच्या दिवशी रोव्हरने एकूण 103 मीटर अंतर कापले. चंद्रावरील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. चांद्रयान-3 प्रकल्पाची योजना एका चंद्र दिवसासाठी होती.

27 किलो वजन असलेले प्रज्ञान चंद्राच्या मातीचे विश्लेषण करत आहे. यासाठी यामध्ये कॅमेरे आणि इतर उपकरण लावण्यात आली आहेत. तसेच चंद्रावर त्याने इस्रोचा लोगो आणि भारतीय तिरंग्याचा ठसा उमटवलाय. चंद्राच्या मातीबद्दलचे निष्कर्ष जगभरातील शास्त्रज्ञांसाठी महत्त्वाची ठरु शकते. चंद्राबद्दल संशोधन करणाऱ्यांसाठी ती खूप उपयुक्त ठरू शकते. निष्कर्षांनुसार, प्रज्ञान लँडिंग साइटपासून 39 मीटर पश्चिमेकडे सरकल्याने खडकांचा आकार आणि संख्या वाढलीये. असे म्हटले होते की खडकाच्या तुकड्यांचा संभाव्य स्त्रोत सुमारे 10 मीटर व्यासाचा खड्डा असू शकतो.

चांद्रयान 4 पुढची मोहिम

चांद्रयान-३ मोहिमेत मोठे यश मिळविल्यानंतर आता इस्रोने नव्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी माहिती दिली होती की, भारताचे पुढील मिशन हे चांद्रयान-4 असणार आहे. भारताच्या अंतराळ स्थानकाचे स्वरूप आणि एनजीएलव्हीचे स्वरूप निश्चित करण्याचे काम आम्ही पूर्ण केले आहे. चंद्रावरून नमुने पृथ्वीवर परत कसे आणता येतील यावरही आम्ही काम केले आहे. आम्ही अनेक प्रक्षेपणांसह याची चाचणी करू, कारण आमचे सध्याचे रॉकेट नमुने परत आणण्यासाठी पुरेसे मोठे नाही.