सत्तावीस वर्षानंतरही काँग्रेस भाजपला का पराभूत करू शकली नाही?; काँग्रेसचा पहिल्यांदाच एवढा मोठा पराभव का?

| Updated on: Dec 08, 2022 | 12:10 PM

काँग्रेस प्रचारात सुरुवातीपासूनच पिछाडीवर होती. त्याबाबत भाजप आधीपासूनच वरचढ होती. गेल्या पाच वर्षात काँग्रेसमधून 19 आमदार फुटून भाजपमध्ये गेले.

सत्तावीस वर्षानंतरही काँग्रेस भाजपला का पराभूत करू शकली नाही?; काँग्रेसचा पहिल्यांदाच एवढा मोठा पराभव का?
सत्तावीस वर्षानंतरही काँग्रेस भाजपला का पराभूत करू शकली नाही?; काँग्रेसचा पहिल्यांदाच एवढा मोठा पराभव का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अहमदाबाद: सत्तावीस वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही भाजप गुजरातमध्ये सत्तेत आली आहे. तर 27 वर्ष सत्तेत राहिलेल्या भाजपला सत्तेतून बाहेर घालवण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. उलट काँग्रेसच्या अत्यंत कमी म्हणजे फक्त 18 जागाच निवडून येताना दिसत आहेत. शिवाय काँग्रेसची मतांची टक्केवारी निम्याहून अधिक झाली आहे. गुजरातच्या इतिहासातील काँग्रेसचा हा सर्वात मोठा पराभव आणि भाजपचा सर्वात मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. त्यामागे काही राजकीय गणितं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

2017च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 49 टक्के मते मिळाली होती. आता या मतांच्या टक्केवारीत 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजे भाजपच्या मतांचा टक्का आता 54 टक्के झाला आहे. मागच्यावेळी भाजपचे 99 उमेदवार निवडून आले होते. यावेळी भाजप 154 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे 27 वर्ष सत्तेत राहूनही भाजपला अँटी इन्कंबन्सीचा सामना करावा लागलेला नाही. उलट अपेक्षेपेक्षा मोठा विजय भाजपला मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

या निवडणुकीत आपला 13 टक्के मते मिळाली आहेत. आपचे सहा उमेदवार आघाडीवर आहे. याचा अर्थ पंजाबनंतर आता आपने गुजरातमध्येही चंचूप्रवेश केला आहे. 13 टक्के मते मिळणं आणि 6 जागांवर उमेदवार आघाडीवर असणं ही आपसाठी मोठी गोष्ट आहे. शिवाय या मतांच्या बेगमीमुळे आपचा राष्ट्रीय पक्ष बनण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

2017च्या निवडणुकीत काँग्रेसला 41 टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेसला निम्मी म्हणजे फक्त 21 टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसचे गेल्या निवडणुकीत 77 आमदार निवडून आले होते. या निवडणुकीत फक्त 18 आमदार निवडून येताना दिसत आहेत. काँग्रेससाठी हा मोठा फटका असल्याचं सांगितलं जात आहे.

काँग्रेसच्या गुजरातमधील पराभवाची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे गुजरातमध्ये काँग्रेसकडे चेहरा नव्हता. काँग्रेसकडे स्टार कँम्पेनरही नव्हता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरातमध्ये मोजक्याच सभा झाल्या. ते भारत जोडो यात्रेत सहभागी होते. प्रियंका गांधी यांच्याही सभा झाल्या नाहीत. आजारपणामुळे सोनिया गांधीही गुजरातकडे फिरकल्या नाहीत. त्याशिवाय काँग्रेसचे इतर नेते गुजरातमध्ये प्रभाव पाडू शकले नाहीत.

काँग्रेस प्रचारात सुरुवातीपासूनच पिछाडीवर होती. त्याबाबत भाजप आधीपासूनच वरचढ होती. गेल्या पाच वर्षात काँग्रेसमधून 19 आमदार फुटून भाजपमध्ये गेले. त्याचा फटकाही काँग्रेसल बसला. हार्दिक पटेल यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

काँग्रेस सोडताना त्यांनी सोनिया गांधी यांना चिठ्ठी लिहिली होती. त्यात काँग्रेसच्या नेतृत्वावर खासकरून राहुल गांधी यांच्याकडे बोट दाखवण्यात आलं होतं. शिवाय पक्षातील राज्याच्या नेतृत्वावरही आगपाखड करणअयात आली होती.

हार्दिक पटेल काँग्रेस सोडून गेल्याने काँग्रेसच्या हातून पटेल मते गेली. ही सर्व मते भाजपच्या बाजूने वळती झाली. ही मते खेचून आणण्यासाठी काँग्रेसने राज्यात नवा पर्याय उभा केला नाही, त्यामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान झाल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसमधील चाणक्य समजले जाणारे अहमद पटेल यांचं निधन झालं. अहमद पटेल यांना गुजरातच्या मतदारांची नाडी माहीत होती. मते खेचून आणण्याची त्यांची ताकद होती. मात्र, तेच हयात नसल्याने काँग्रेससाठी प्लॅनिंग करणारा नेता उरला नाही, त्याचा फटका या निवडणुकीत बसलेला दिसून येतो.

गुजरात हातचं गेलं म्हणजे दिल्ली हातातून जाऊ शकते. गुजरात केवळ पंतप्रधानांचं होम ग्राऊंड नाही, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचंही होम ग्राऊंड आहे. त्यामुळे होम पीचवर पराभव झाल्यास त्याची लाट अख्ख्या देशभर येऊ शकते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहीत होते. त्यामुळेच त्यांनी गुजरातमध्ये प्रचारांचा धडाका लावला होता. असा धडाका काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने लावलेला दिसला नाही.

तर, दुसरीकडे मोदी-शहा यांच्या होम ग्राऊंडवरच त्यांना मात देण्याची रणनीती आखण्यात काँग्रेस कमी पडली. त्यामुळे काँग्रेसला त्याचा फायदा गुजरातमध्येच नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही पडण्याची शक्यता आहे.