मोदींना पुन्हा पंतप्रधान करा, पुढच्या 6 महिन्यात पीओके भारतात असेल – योगी

| Updated on: May 18, 2024 | 7:50 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेतल्या. या सभेला संबोधित करताना त्यांनी हा नवा भारत असून तो आता कुणालाही घाबरत नाही असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी पोओकेबाबत ही मोठे वक्तव्य केले आहे.

मोदींना पुन्हा पंतप्रधान करा, पुढच्या 6 महिन्यात पीओके भारतात असेल - योगी
Follow us on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी महाराष्ट्रात सभा घेतली. यावेळी पालघरमधील सभेला संबोधित करताना त्यांनी पीओकेबाबत मोठा दावा केलाय. सीएम योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘जो आम्हाला मारतो त्याची आम्ही पूजा करणार नाही. जर कोणी आमच्या लोकांना मारले तर आम्ही देखील तेच करू जे त्याच्या लायकीचे आहे. आता हेच होत आहे. आता पाकव्याप्त काश्मीर वाचवणेही पाकिस्तानला कठीण जात आहे. तुम्ही नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करुन दाखवा. पुढील 6 महिन्यात पीओके भारताचा होईल हे तुम्हाला दिसेल. यासाठी हिंमत लागते. ताकद असेल तरच हे काम करता येईल.

हा नवा भारत आहे- योगी

योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘आम्ही काँग्रेस आणि इंडिया आघाडी सारखे नाही. हे लोक म्हणायचे की पाकिस्तानातून दहशतवादी येत आहे मग आम्ही काय करू. आज पाकिस्तानने आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तरी डोळे काढले जातात. न घाबरता, न थांबता आणि खचून न जाता विकासाच्या प्रवासात वाटचाल करणारा हा नवा भारत आहे. याचे नेतृत्व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. या प्रकारचा नवा भारत तुम्हा सर्वांसमोर आहे.

काँग्रेसवर टीका

वारसा कर लागू करण्याच्या कथित प्रस्तावावर मुख्यमंत्री योगी यांनी काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले की, मुघल सम्राट औरंगजेबच्या आत्म्याने विरोधी पक्षात प्रवेश केला आहे. वारसा कर हा औरंगजेबाने लावलेल्या जिझिया करासारखा आहे, असेही योगी म्हणाले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात एका सभेला संबोधित करताना आदित्यनाथ म्हणाले की, भाजप केवळ सत्तेसाठी नाही तर विकसित भारत घडवण्यासाठी निवडणूक लढवत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत यात शंका नसावी.

योगींनी दिला ४०० पारचा नारा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे बुलडोझर पोस्टर लावून अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले. कुर्ल्यातील सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, मोदी सरकारचे नारे पुन्हा एकदा देशभर गुंजत आहेत. यावेळी 400 च्या वर गेल्याने काँग्रेस आणि विरोधक त्रस्त आहेत. योगी आदित्यनाथ यांनी मुंब्रा देवीसह सिद्धिविनायकाचे ही दर्शन घेतले. योगी आदित्यनाथ यांनी भारत माता की जय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात लढत आहे.