स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'मध्ये महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धा सुरू होणार आहे. अरुंधतीने या स्पर्धेत भाग घेत नवं आव्हान स्वीकारलं आहे. अरुंधतीला या स्पर्धेत मिहीर शर्मा साथ देणार आहे.
अरुंधती आणि मिहीरला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी अनिरुद्ध आणि संजनानेदेखील कंबर कसली आहे. त्यामुळे स्पर्धा चुरशीची होणार हे मात्र नक्की. अरुंधतीची स्वयंपाकाची आवड सर्वांनाच माहित आहे.
या स्पर्धेत उतरण्याचं कारण फक्त स्वयंपाकाची आवड इतकंच नाही. तर अरुंधतीला आपलं घर म्हणजेच समृद्धी निवास वाचवायचं आहे. अनिरुद्ध-संजनाने घरावर हक्क दाखवलाय. समृद्धी निवास पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची गरज आहे आणि म्हणूनच ती महाराष्ट्राची सुगरण स्पर्धेत भाग घेणार आहे.
अरुंधतीला साथ देणारा मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. त्यामुळे ही जोडी या स्पर्धेत आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहेत. मात्र अरुंधती जिंकू नये यासाठी अनिरुद्ध आणि संजनादेखील या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे 'आई कुठे काय करते' मालिकेतली ही स्पर्धा उत्कंठावर्धक होणार यात शंका नाही.
मालिकेत पहिल्यांदा अशाप्रकारची स्पर्धा होत असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे. मालिकेची संपूर्ण टीम हा सीन करताना खूप धमाल करत आहेत. ही उत्कंठावर्धक चुरस प्रेक्षकांना 'आई कुठे काय करते' या मालिकेत दुपारी 2.30 वाजता पहायला मिळेल.