बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) आणि त्याची पत्नी किरण राव (Kiran Rao) या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
आमिर खान आणि किरण रावने संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली.
“गेल्या 15 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू,” असे या निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आमिर खान यांच्याबरोबर किरण राव शेताच्या बांधावर गेल्या होत्या. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे त्यांनी पालथे घातले.
अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून मोठं काम केलं. यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्यांची वेळोवेळी स्तुती केली. त्यांना भक्कम पाठिंबा दिला. किरण राव आणि आमीर खान या दोघांनी कित्येक गावांमध्ये पाण्याच्या रूपाने नवसंजीवनी आणली. जिथं गेली अनेक दशकं माळरान होतं तिथं हिरवी स्वप्न फुलवली. आमिर खान, किरण राव आणि संपूर्ण पाणी फाउंडेशनच्या टीमने महाराष्ट्रातला दुष्काळ हटवण्यासाठी मोठं काम केलं.
या दोघांनी हा निर्णय का घेतला असेल हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर चर्चे सुरु झाल्या आहेत.