लग्न म्हटलं की मराठी कुटुंबात खूप प्रेमाने आणि आपुलकीने सगळे विधी पारंपरिक पद्धतींनी पार पाडले जातात. असाच एक विधी म्हणजे केळवण. जो लग्नाच्या आधी नातेवाईक आणि मित्र परिवार नवं दाम्पत्यासाठी करतात.
घरात लग्नकार्य असेल तर हमखास केळवणाची आमंत्रणं येतात. पूर्वी नवरीचं केळवण करण्याची पद्धत होती. पण हल्ली नवरा-नवरी दोघांनाही मित्रमंडळींकडून केळवणाचं आमंत्रण दिलं जातं.
झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या लाडक्या जोड्या म्हणजेच एजे-लीला, आकाश-वसुंधरा, आशु-शिवा आणि पारू-आदित्य यांचा केळवण सोहळा झी मराठीने प्रेक्षकांसोबत पार पाडला आहे.
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रणव रावराणे आणि अंकिता मेस्त्री यांनी केलं. आशुला तर चक्क एका काकूंनी शिवाला आपल्या प्रेमाची कबुली कशी दिली पाहिजे हे शिकवलं, तर कोणी लीलाला एजेला हसववण्याचा सल्ला दिला.
आकाशने उखाण्याच्या खेळात बाजी मारली तर उखाण्याच्या खेळात लीलाने, वसुंधरेच्या गुरुची भूमिका पार पाडली. उपस्थित असलेल्या बायकांनी या जोड्यांचं औक्षण केलं. इतकंच नाही तर आशीर्वादसुद्धा वेगळ्या पद्धतींनी दिले गेले.
काही महिलांनी होणाऱ्या वर-वधूला मोलाचे सल्ले दिले. येणाऱ्या नव्या आयुष्याची सुरुवात कशी करावी, नव नातं कसं बहरेल याविषयी देखील सल्ले दिले गेले. उत्कृष्ट जेवणानंतर आलेल्या पाहुण्यांसाठी खास भेट ही दिली गेली.
केळवण तर या जोड्यांचं झालंच पण आता त्यांचं लग्न नेमकं कसं पार पडेल, या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना विवाह विशेष सप्ताहात पाहायला मिळेल.