अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखले जातात. नानांनी त्यांच्या करिअरमध्ये बरेच हिट चित्रपट दिले आहेत. प्रत्येक भूमिकेत ते जीव ओतून काम करतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले.
या मुलाखतीत नानांना हिंदू-मुस्लीम यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. "तुम्हाला हिंदू-मुस्लीममध्ये काही फरक वाटतो का?" असं विचारलं असता ते म्हणाले, "खरंतर मला समजून घ्यायचं आहे. इतकी वर्षे झाली आहेत, पण मलाही अद्याप हा फरक समजला नाही."
"मला आजपर्यंत कधीच फरक जाणवला नाही. सर्वांत आधी देश असला पाहिजे, त्याच्याशिवाय काहीच नाही. त्यानंतर माझी नाती आणि धर्म, पण सर्वांत आधी देश", असं मत नानांनी मांडलं.
नाना पुढे म्हणाले, "असं झाल्यानंतर आपल्याला समस्याच नसली पाहिजे. त्या दिशेने जाण्याचे मार्ग वेगवेगळे असतील. पण परदेशात गेल्यावर तुम्हाला भारतीयच म्हटलं जातं ना. तेव्हा तुमची जात विचारली जात नाही."
"परदेशात जाऊन एकमेकांशी अत्यंत प्रेमाने भेटतील. पण इथे असताना एकमेकांशी समस्या असते. पण शेवटी आपण याकडे कसं पाहतो, हा प्रत्येकाच्या दृष्टीकोनाचा भाग आहे", असंही नाना म्हणाले.