शिशिराची थंडी ओसरायला लागली, पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की वसंताची चाहुल लागते. या वसंतात फक्त रंगांची उधळण, निसर्गाचा रंगोत्सव सुरू होतो.
कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच, अशी म्हण प्रचलित आहे. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत. पूर्वी या पानांपासूनच मोठय़ा पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात. पळस हा डोंगराळ भागात किंवा शेताच्या धुऱ्या-बांधावर दिसणारा झाड आहे.
सध्या शेतात जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेताना तो दिसत आहे. बहरात आलेला पळस तर अक्षरश: ज्वालेसारखा दिसू लागला आहे. धुलिवंदनाला रंग खेळण्यासाठी पळस फुलांचा वापर केला जातो. तर आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर केला जातो.
सध्या त्याच्याकडे लक्ष जाताच पाहणाऱ्याच्या डोळ्यांना भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला असून शेतांमध्ये कडक ऊन असतानाही डोळ्यांना थोडा का होत नाही, पण दिलासा देणारा म्हणूनच ओळखला जात आहे.
नवचैतन्य, उत्कर्षाचा प्रतिक म्हणून वसंत ऋतू ओळखला जातो. वसंत ऋतूला झाडाला पालवी फुटतात. त्यामुळे वसंत पंचमीला देशभरात वसंतोत्सव साजरा केले जाते.
शिशिरात बोडक्या झालेल्या शेताला केशरी, लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस बहरला आहे. वसंताचे स्वागत करण्यासाठी पळस नटलेला चोहीकडे पाहण्यास मिळत आहे. झाडाच्या प्रत्येक फांदीवर लागलेली फुले विस्तवाच्या गोळ्यांसारखे दिसत आहेत.