'शक्तीमान'मध्ये गंगाधर-शक्तीमान अशा दुहेरी भूमिका आणि 'महाभारत' या मालिकेत भीष्म पितामह यांची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना सध्या 65 वर्षांचे आहेत. मात्र आजही ते अविवाहित आहेत.
मुकेश खन्ना यांना आजवर अनेकदा विचारलं गेलं की त्यांनी लग्न का केलं नाही? त्यांच्या आयुष्यात कधी प्रेम आलंच नाही का? याचं उत्तर आता खुद्द मुकेश खन्ना यांनी दिलं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित त्यांनी याचं उत्तर दिलं आहे.
त्यांनी लिहिलं, 'एक भीष्म प्रतिज्ञा कोणाच्या लग्नाला रोखू शकते का? लोकांना असं वाटतं की माझ्यासोबत असंच घडलंय. पण मला असं नाही वाटत. माझ्या मते लग्न हे दोन आत्मांचं मिलन असतं. कदाचित मला ती आत्मा अजून भेटली नाही. कदाचित भेटू शकते.'
'लोकांना असंही वाटतं की जितके अधिक गर्लफ्रेंड्स तितकं तुमचं पुरुषत्व सिद्ध होतं. मी असं मानत नाही. लोकांना असंही वाटतं की पत्नीने पतिव्रता असायला हवं. माझ्या मते पतीनेसुद्धा पत्नीव्रता असायला पाहिजे. पण हे मात्र खरंय की माझं लग्न भीष्म प्रतिज्ञाने रोखलं नाही,' असंही त्यांनी म्हटलंय.
मुकेश खन्ना यांनी त्यांच्या या पोस्टद्वारे असंही स्पष्ट केलंय की ते आजही जोडीदाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्यांचं समर्थन करत आहेत. लग्नाबद्दल तुमचे विचार खूपच चांगले आहेत, असं नेटकरी म्हणत आहेत.