मुंबई इंडियन्स आता आयपीएल फायनलमध्ये जाण्यापासून एक पाऊल दूर आहे. गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यात क्वालिफायर 2 सामना होणार आहे.हा सामना जिंकणारी टीम अंतिम फेरीत पोहचेल. मुंबईने आतापर्यंत एकदाही प्लेऑफमध्ये सामना गमावलेला नाही. मात्र गुजरातचे 3 खेळाडू हे मुंबईला फायनलमध्ये जाण्यापासून रोखण्यात निर्णायक भूमिका बजावू शकतात. त्यामुळे मुंबईला फायनलमध्ये पोहचण्यासाठी गुजरातच्या या तिघांचा इलाज करावाच लागेल.
मोहम्मद शमी,राशिद खान आणि शुबमन गिल गुजरातची ही तिकडी आयपीएल 16 व्या मोसमाच्या सुरुवातीपासून ताबडतोड कामगिरी करतेय. विशेष बाब म्हणजे पर्पल कॅपच्या शर्यतीत मोहम्मद शमी आणि राशिद खान हे दोघे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. तर दुसऱ्या बाजूला शुबमन गिल ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शुबमन गिल ऑरेन्ज कॅपसाठी आणि टीमला भक्कम सुरुवात देण्यासाठी धमाकेदार कामगिरी करण्याच्या तयारीत असणार आहे.
मोहम्मद शमी याने आतापर्यंत या हंगामातील 15 सामन्यांमध्ये 26 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे मुंबईला शमीच्या भेदक गोलंदाजीचा जरा जपणूच सामना करावा लागेल.
डोक्याला शॉट म्हणजे राशिद खान याच्यात बॉलिंगसह बॅटिंग करण्याची क्षमता आहे. राशिदने या हंगामातील 15 सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच राशिदने 12 मे रोजी मुंबई विरुद्धच 32 बॉलमध्ये 79 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यामुळे राशिदचं बॉलर आणि बॅट्समन असं दुहेरी रुपातील आव्हान पलटणसमोर असणार आहे. आता या राशिद नावाच्या डोकेदुखीवर कोणता खेळाडू मलम लावणार, हे थोड्या वेळेतच स्पष्ट होईल.
शुबमन गिल याने या मोसमातील 15 सामन्यांमध्ये सलग 2 शतकांच्या मदतीने 722 धावा केल्या आहेत. शुबमन गिल याला ऑरेन्ज कॅप मिळवण्यासाठी फक्त 9 धावांची गरज आहे. सध्या ऑरेन्ज कॅप ही आरसीबी कॅप्टन फाफ डु प्लेसीस याच्याकडे आहे. फाफने 14 मॅचमध्ये 730 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता शुबमन मुंबई विरुद्धच्या सामन्यात धमाका करतो की पलटण या युवा बॅट्समनला झटपट आऊट करण्यात यशस्वी ठरते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.