कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिग्गज पटकथालेखक सलीम खान त्यांच्या तीन मुलांसोबत पोहोचले होते. सलमान, अरबाज आणि सोहैल खान यांच्यासोबत ते या शोमध्ये उपस्थित राहिले होते. या एपिसोडमध्ये सलीम खान यांनी 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॅलो ब्रदर' या चित्रपटाविषयी मत मांडलं होतं.
सोहैल खानने हा चित्रपट बनवला होता आणि त्यात अरबाज, सलमान या दोघांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. जेव्हा सोहैलने वडील सलीम खान यांना तो चित्रपट दाखवला, तेव्हा त्यांनी एक सल्ला दिला होता. याविषयी त्यांनी 'कपिल शर्मा'च्या शोमध्ये सांगितलं होतं.
सलीम खान यांनी म्हटलं होतं की चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं की त्यात भूमिकांची अदलाबदल करणं गरजेचं होतं. "या चित्रपटात मध्यांतराच्या आधीच सलमानच्या भूमिकेचा मृत्यू होतो. ही भूमिका खरंतर अरबाजने साकारायला पाहिजे होती."
"चित्रपटात जेव्हा सलमानचा मृत्यू दाखवला गेला, तेव्हाच थिएटरमधून अर्धा प्रेक्षकवर्ग बाहेर निघून गेला. अरबाजच्या भूमिकेचा मृत्यू दाखवला असता तर कदाचित त्यांची इतकी निराशा झाली नसती", असं सलीम खान म्हणाले.
'हॅलो ब्रदर' या चित्रपटात सलमान आणि अरबाज खानसोबतच राणी मुखर्जी आणि शक्ती कपूर यांच्याही भूमिका होत्या. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आयुष्कलम' या मल्याळम चित्रपटाचा हा रिमेक होता. विशेष म्हणजे हा मल्याळम चित्रपटसुद्धा 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'घोस्ट' या अमेरिकन चित्रपटाचा रिमेक होता.