वरुणराजाचं आगमन झालं की चाहूल लागते ती वटपौर्णिमा सणाची. पती-पत्नीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा हा सण प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमध्येही उत्साहात साजरा होणार आहे. टीआरपीच्या यादीत नंबर वन असलेली मालिका 'ठरलं तर मग'मध्ये यंदाची वटपौर्णिमा खास ठरणार आहे.
सायली-अर्जुनचं नातं बहरू लागलं आहे. दोघांनीही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली नसली तरी मनात मात्र जन्मोजन्मी आम्हाला एकमेकांची साथ लाभू दे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
यंदा वटपौर्णिमेची पूजा सायली तर करणारच आहे. पण सायलीसोबत अर्जुनही वडाभोवती सात फेऱ्या घेऊन हे व्रत पूर्ण करणार आहे. अर्जुनने सायलीसाठी उपवासही केला आहे. 'ठरलं तर मग'च्या वटपौर्णिमा विशेष भागात प्रेक्षकांना यापुढील कथा पहायला मिळेल.
अर्जुन-सायली प्रमाणेच मुरांबा मालिकेतला अक्षयही रमासोबत वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे. आरतीच्या निधनानंतर तिच्या बाळाची जबाबदारी रमाने स्वीकारली. आईच्या मायेने ती या बाळाला जीवापाड जपतेय. आईपणाच्या सगळ्या जबाबदाऱ्या नेटाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतेय.
तिच्या या नव्या जबाबदारीमध्ये अक्षयही तिला मनापासून साथ देतोय. वटपौर्णिमेच्या पुजेसाठीही उसंत नसताना अक्षयने रमासाठी पुजेची सर्व तयारी केली. रमा आणि आपल्या लेकीसोबत वडाभोवती फेरे घेताना जबाबदारीही अशीच जन्मोजन्मी पूर्ण करेन हे वचन त्याने रमाला दिलंय.