अमोल कोल्हेंनी अभिनयाबाबत घेतला मोठा निर्णय; म्हणाले “पुढील पाच वर्षे..”

| Updated on: May 10, 2024 | 11:43 AM

अभिनेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. विरोधकांच्या टीकेनंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातून पुढील पाच वर्षे ब्रेक घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. तुम्हाला कार्यसम्राट हवा की नटसम्राट अशी टीका विरोधकांनी केली होती.

अमोल कोल्हेंनी अभिनयाबाबत घेतला मोठा निर्णय; म्हणाले पुढील पाच वर्षे..
खासदार अमोल कोल्हे
Follow us on

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या ऐतिहासिक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण करणारे अभिनेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिरुरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढील पाच वर्षे अभिनयातून संन्यास घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. “शिरुर लोकसभा मतदारसंघाची ही जबाबदारी पुढील पाच वर्षांसाठी माझ्यावर आहे. या जबाबदारीच्या दृष्टीने, सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने, मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. आज मी सात ते आठ लोकसभा मतदारसंघात प्रचार करतोय. त्यामुळे या जबाबदाऱ्या वाढत गेल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी तेवढा वेळ देणं गरजेचं आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हेंच्या अभिनय क्षेत्रावरून अजित पवार आणि आढळराव यांच्याकडून टीका झाली होती. तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार पाहिजे, असाही सवाल करण्यात आला होता. अभिनयातून संन्यास घेण्याच्या निर्णयाविषयी ते पुढे म्हणाले, “गेल्या पाच वर्षांमध्ये मी फक्त एकच मालिका केली. विरोधकांचा धादांत अपप्रचार आहे की अमोल कोल्हे व्यस्त होते. हा जनसंपर्क कमी असण्याची काही वेगळी कारणं आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही सगळी वेगळी कारणं समोर येतील. परंतु हे सगळे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता वेळ देणं गरजेचं आहे. त्यासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घ्यावा लागला, तरी माझी काही हरकत नाही. मी तो ब्रेक घ्यायला तयार आहे. या पाच वर्षांत शिरुर मतदारसंघातील जनतेला पुरेसा वेळ देण्याच्या दृष्टीने मी अभिनयातून ब्रेक घेत आहे.”

हे सुद्धा वाचा

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी अमोल कोल्हेंवर टीका केली होती. “कोल्हेंनी किती संपर्क ठेवला, किती लोकांना उपलब्ध राहिले, हे जनतेला माहिती आहे. तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट हवा”, असा सवाल त्यांनी लोकांना केला होता.