अंबादास दानवे यांनी 8 मुद्दे मांडले अन् ‘कलंक’चा अर्थ सांगितला; म्हणाले…

| Updated on: Jul 11, 2023 | 2:54 PM

Ambadas Danve on DCM Devendra Fadnavis : 'कावळ्यांची काविळ' म्हणत अंबादास दानवे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल; 8 मुद्दे मांडत घणाघात

अंबादास दानवे यांनी 8 मुद्दे मांडले अन् कलंकचा अर्थ सांगितला; म्हणाले...
Follow us on

छत्रपती संभाजीनगर : ‘कलंक’ या शब्दावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काल नागपूरमध्ये होते. तिथे त्यांनी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांवर निशाणा साधला. फडणवीस यांचा थेट ‘कलंक’ असा उल्लेख ठाकरे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटत आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही ‘कलंकीचा काविळ’ म्हणत ठाकरेंना प्रत्त्युतर दिलंय.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतर ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कावळ्यांची काविळ!, म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तसंच आठ मुद्दे मांडत ‘कलंक’चा अर्थ त्यांनी सांगितला आहे.

अंबादास दानवे यांचं ट्विट जसंच्या तसं…

कावळ्यांची काविळ!

१. ज्यांच्या विरुद्ध लढून तुमच्या पक्षाचा पाया मजबूत केला अश्या गोपीनाथ मुंडे यांच्या लढ्याला तिलांजली देऊन त्यांचे राजकीय वैरी फोडाफोडीने जवळ करणे, याला म्हणतात कलंक!

२. ‘मन की बात’ उर्दूतून प्रसिद्ध करणे, मशिद भ्रमण करणे आणि पुन्हा स्वतःला हिंदुत्वाचा पाईक म्हणणे, याला म्हणतात कलंक!

३. समुद्रात झेप घेऊन मर्सिलिस बंदर गाठणाऱ्या वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार न देणे, याला म्हणतात कलंक!

४. राम मंदिर आंदोलनात कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या व्यक्तीला ‘पद्मविभूषण’ देणे, याला म्हणतात कलंक!

५. आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तींना दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करणे, वारकऱ्यांवर लाठ्या चालवणे, याला म्हणतात कलंक!

६. महाराष्ट्रातून दरदिवशी ७० महिला बेपत्ता होतात आणि त्यांचा थांगपत्ता लावण्यात पोलिसांना यश येत नाही, हा आहे कलंक!

७. कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार न करता त्यांचे शव गंगेत वाहू देणे, पीएम केअर फंडाचा हिशेब जनतेपुढे न ठेवणे, याला म्हणतात कलंक!

८. कोरोना महामारी शिखर गाठत असताना पश्चिम बंगालसारख्या दाट लोकसंख्येच्या राज्यात हट्टीपणाने निवडणुकांच्या प्रचारसभा घेणे, परिस्थिती अनुकूल नाही म्हणून महाराष्ट्रात निवडणूका न घेणे, याला लोकशाहीवर कलंक म्हणतात!

कलंक नसताना तो दिसणे त्याला नजरेतील दोष म्हणतात, दिसून न दिसल्यासारखं करणे त्याला ढोंगीपणा म्हणतात. उपचार आता भाजपवर होतील आणि ते जनताच करणार आहे. त्रिशूळ असल्याचे सोंग तुम्ही आणता, मात्र तिसरा डोळा मतदारांकडेच आहे. ते योग्यवेळी तो उघडतील आणि कलंक पुसतील.

देवेंद्र फणडवीस यांचं ट्विट काय होतं?

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘कलंकीचा काविळ!’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. त्यांनी आठ मुद्दे मांडले आहेत.