सर्वात मोठी बातमी! ‘त्या’ बैठकीत भाजप नेत्यांचं फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना झुकतं माप?; बैठकीतला मोठा निर्णय काय?

| Updated on: Jul 10, 2024 | 10:36 AM

शिंदे गटाने विधानसभेसाठी 288 पैकी 100 जागांची मागणी केली आहे. या मागणीला भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून विरोध होताना दिसत आहे.

सर्वात मोठी बातमी! त्या बैठकीत भाजप नेत्यांचं फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना झुकतं माप?; बैठकीतला मोठा निर्णय काय?
एकनाथ शिंदे
Follow us on

Eknath Shinde Big Responsibility : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. भाजपला फक्त 9 जागांवर समाधान मानावे लागले. त्यातच आता येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र शिंदे गटाने विधानसभेसाठी 288 पैकी 100 जागांची मागणी केली आहे. या मागणीला भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून विरोध होताना दिसत आहे.

भाजपकडून निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच मुंबईत प्रदेश भाजपच्या कोअर गटाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात भाजप नेत्यांची मतं जाणून घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीसंदर्भातही चर्चा झाली. त्यावेळी राज्यातील मराठा-ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातून आलेल्या शिंदेंनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवल्यास काय होईल, यावरही चर्चा करण्यात आली.

या चर्चेचा सूर पाहता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत एकनाथ शिंदेंना झुकते माप दिल्याचे बोललं जात आहे. त्यासोबतच विधानसभा निवडणुकीत यश मिळवून महायुती पुन्हा सत्तेत आली, तर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचीच वर्णी लागू शकते, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदेंचे पारडे जड

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या महाराष्ट्रातील खराब कामगिरीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन पक्षावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरल्याची चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने 15 जागा लढवून 7 जागा जिंकल्या होत्या. तर, भाजपने 28 जागा लढवून फक्त 9 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाने 4 जागांपैकी 1 जागा जिंकली. यामुळे महायुतीमध्ये शिंदे गटानेच सर्वाधिक चांगली कामगिरी केल्यामुळे शिंदेंचे पारडे जड झाले आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदेगट अधिक आग्रही राहण्याची शक्यता आहे. सध्या शिंदे गटाने भाजपकडे 288 पैकी 100 जागांची मागणी केली आहे. मात्र भापजच्या स्थानिक नेतृत्वाकडून इतक्या जास्त जागा देण्यास विरोध केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.