BIG News | नवाब मलिक यांना सत्तेत सहभागी करुन घेण्यास फडणवीसांचा विरोध, अजित पवारांना पाठवलं पत्र

| Updated on: Dec 07, 2023 | 7:00 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना महायुतीत समाविष्ट करुन घेण्यास देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांना युतीत समाविष्ट करुन घेऊ नये, असं स्पष्ट शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्राद्वारे म्हटलं आहे.

BIG News | नवाब मलिक यांना सत्तेत सहभागी करुन घेण्यास फडणवीसांचा विरोध, अजित पवारांना पाठवलं पत्र
Follow us on

नागपूर | 7 डिसेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आज अनेक महिन्यांनंतर प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर दिसले. नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात गेले आहेत. त्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत हजेरी लावली. यावेळी ते सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या बाकावर बसले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केलेली. भाजपने नवाब मलिक यांच्याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असं अंबादास दानवे म्हणाले होते. त्यावर फडणवीसांनी आम्ही कुणाच्या मांडीला मांडी लावून बसत नाही. मी फक्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना युतीत समाविष्ट करुन घेण्यास विरोध केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तसं पत्र अजित पवार यांना पाठवल्याची माहिती समोर आली आहे. “सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही”, अशा स्पष्ट शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली आहे.  त्यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस पत्रात नेमकं काय म्हणाले आहेत?

“माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. पण ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही”, असे आमचे मत आहे, असं देवेंद्र फडणवीस पत्रात म्हणाले.

“सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे. हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे”, असं फडणवीसांनी पत्रात स्पष्ट केलं.

“त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे”, असं देवेंद्र फडणवीस पत्रात म्हणाले आहेत.