जयंत पाटील यांचा कालचा दावा आज फोल?, काल म्हणाले, आमच्याकडे 19 आमदार, प्रत्यक्षात विधानसभेतील आकडा काय?

| Updated on: Jul 17, 2023 | 1:32 PM

अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नरहरी झिरवळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी काल शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

जयंत पाटील यांचा कालचा दावा आज फोल?, काल म्हणाले, आमच्याकडे 19 आमदार, प्रत्यक्षात विधानसभेतील आकडा काय?
jayant patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 17 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर दोन्ही गटाने प्रचंड शक्तीप्रदर्शन केलं. दोन्ही गटाकडून आमच्याकडेच सर्वाधिक आमदार असल्याचा दावाही करण्यात आला. अजित पवार गटाने त्यांच्याकडे 40 आमदार असल्याचा दावा केला. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्याकडे 19 आमदारांचं बळ असल्याचा दावा केला होता. कालच जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीकडे 19 आमदार असल्याचा दावा केला होता. पण आज त्यांचा हा दावा फोल ठरल्याचं दिसून येत आहे.

विधीमंडळाचं अधिवेशन सुरू होताच उपमुख्यमंत्री अजित पवार विधिमंडळात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सर्व आमदारा होते. अजितदादांनी आपल्या आमदारांसोबत शक्तीप्रदर्शनही केलं. त्यानंतर ते सभागृहात निघून गेले. सभागृहात अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या आमदारांची बसण्याची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली होती. अजितदादा गटाना अधिक जागा देण्यात आली होती. त्यांची आमदार संख्याही अधिक होती. मात्र, शरद पवार गटाच्या जागेवर फक्त आठच आमदार बसलेले होते. त्यामुळे शरद पवार गटाच्या मागे फक्त आठच आमदार आहेत का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

फक्त आठच आमदार

शरद पवार गटासाठी देण्यात आलेल्या जागेवर फक्त आठच आमदार बसलेले होते. जयंत पाटील, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, प्राजक्त तनपुरे, राजेश टोपे, सुमन पाटील, सुनील भुसारा आणि रोहित पवार आदी आमदार शरद पवार गटाला दिलेल्या जागेवर बसलेले होते. जितेंद्र आव्हाड सभागृहात दिसले नाहीत. त्यांना पकडून राष्ट्रवादीच्या आमदारांचं संख्याबळ नऊ होतं. त्यामुळे इतर 10 आमदार गेले कुठे असा सवाल केला जात आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या एकूण 54 आहे. त्यापैकी 40 आमदार अजित पवार गटाकडे आहेत. तर नऊ आमदार शरद पवार गटाकडे आहेत. त्यामुळे या दोन्ही आमदारांची संख्या 49 होते. त्यामुळे इतर पाच आमदार कुणाच्या बाजूने आहेत? अशी चर्चा आता रंगली आहे.

पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही

पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतियांश आमदार फुटले तर हा कायदा लागू होत नाही. कमी आमदार फुटले तर हा कायदा लागू होतो. त्यामुळे अजित पवार गटाकडे कमीत कमी 36 आमदाराचं बळ असेल तरच ते या कायद्याच्या कारवाईतून वाचू शकतात. दादाच्या गटाच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे 40 आमदार आहेत. त्यामुळे हा कायदा त्यांना लागू होत नसल्याचं सांगितलं जात आहे.

भेटीतून मार्ग नाही

दरम्यान, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नरहरी झिरवळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी काल शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तुम्हीच हा गुंता सोडवा. आम्हाला आशीर्वाद द्या, असं साकडं या मंत्र्यांनी शरद पवार यांना घातलं. तर तुम्हीच माझे विठ्ठल आहात, असं छगन भुजबळ पवारांना म्हणाले. मात्र, शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचं सांगण्यात येत आहे.