विधानसभा निवडणुका घेण्यावरून सरकारमध्ये मतभेद?; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

| Updated on: Sep 21, 2024 | 7:07 PM

राष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवण्याचं काम हे सरकारचं करणार आहे. कारण आता दुसरा कुठलाही पर्याय या सरकारकडे राहिलेला नाही, असा खळबळजनक दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. तुमचं आमचं जे दैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराज... त्यांच्या पुतळ्यातही यांनी पैसे खाल्ले हो... पैसे खाल्ले तर खाल्ले, पण पुतळाही पडला. हे पाप त्यांनी केलं. ते आपण कधीच विसरणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

विधानसभा निवडणुका घेण्यावरून सरकारमध्ये मतभेद?; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. याचं कारण म्हणजे सरकारला निवडणुका घ्यायचं धाडस नाहीये. सरकारमध्ये मतमतांतर आहे. कायद्याने 26 नोव्हेंबर रोजी निवडणुका घ्याव्या लागतील. मात्र आपलं काही खरं नाही असं सरकारला वाटत आहे म्हणून त्या पुढे ढकलल्या जात आहेत, असा खळबळजनक दावा शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. चाळीसगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

काही लोक निवडणुका पुढे ढकलण्याचं काम करत आहेत. महाविकास आघाडी पाच वर्ष सत्तेत राहिली तर आपलं काही खरं नाही या भीतीने यांनी आमचं सरकार पडलं. वर्ष उलटत नाही तोपर्यंत भाजपने राष्ट्रवादीही फोडली. दोन प्रमुख पक्ष फुटले याचा जनतेच्या मनात मोठा राग आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भाजप कधी मैदानात येते आणि कधी आम्ही त्यांचा सुपडासाफ करतो याची लोक वाट पाहत आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.

भाजपवाले बिथरले

दोन प्रमुख पक्ष फोडणं आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याची सुनावणी न होणं हे लोकशाहीच्यादृष्टीने धक्कादायक आहे. त्यामुळेच भाजपवाले बिथरले आहेत. आमचं सरकार येणार नाही. लोक आमच्या विरोधात आहेत, असं भाजपवाले आम्हाला खाजगीमध्ये सांगत आहेत. रस्त्यांच्या कामात सत्ताधारी आमदार भ्रष्टाचार करत आहेत. हे सर्व आपल्याला थांबवायचं आहे. चंद्रावर जाण्यासाठी 600 कोटी रुपये खर्च येतो. यावर मी बोलतो तर, एक बाटली घेतली की माणूस चंद्रावर जातो त्याला 600 कोटी रुपये खर्च करावा लागत नाही, असा देवेंद्र फडणवीस यांचा दावा आहे, असा हल्लाच जयंत पाटील यांनी चढवला.

तेवढं गुलाबी नाही

महाराष्ट्राची लूट चालली आहे. यांनीच जाहीर केलेल्या योजनांसाठी यांच्याकडे पैसे नाहीत. यांची खुर्चीसाठी धडपड सुरू आहे. आपल्याला जेवढं दिसत तेवढं गुलाबी नाही, असा टोला त्यांनी अजित पवार यांना नाव न घेता लगावला.

वचन देतो की…

राज्यात अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. बहीण कुठे गेली की ती परत सुरक्षित परत येईल का? हे माहीत नाही. या मतदारसंघात राष्ट्रवादीचं जाळं सक्षम आहे. या मतदारसंघातल्या आया बहिणींना आश्वासन देतो की, उद्या आमचं महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. आमचं सरकार आल्यानंतर एकाही आया बहिणीच्या केसालाही धक्का लागणार नाही, असंही ते म्हणाले.