रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला काटोल विधानसभा मतदारसंघ मागच्या दोन वर्षांपासून सतत चर्चेत आहे. याला कारण आहे अनिल देशमुख. काटोल विधानसभा मतदारसंघ विदर्भात येतो. अनिल देशमुख हे शरद पवार गटाचे नेते असून त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये विविध मंत्रीपद भूषवली आहेत. शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी अनिल देशमुख यांची ओळख. 2019 साली महाविकास आघाडीच सरकार सत्तेवर आल्यानंतर अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री झाले. अनिल देशमुख हे गृहमंत्री पदावर असताना त्यांच्यावर वसुलीचे आरोप झाले. या प्रकरणात त्यांना काही काळ तुरुंगात काढावा लागला. आता काटोल विधानसभा क्षेत्रातून अनिल देशमुख निवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात अनिल देशमुख यांचं नाव आहे.
अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेले शाब्दीक वादही चांगलेच गाजले. त्यावेळी ते फडणवीसांना त्यांच्या होम पीचवर म्हणजे नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आव्हान देणार असं बोलल जात होतं. पण अनिल देशमुख काटोलमधूनच लढणार आहे. काटोल या विधानसभा क्षेत्रावर नेहमीच देशमुख कुटुंबाच वर्चस्व राहिलं आहे. अनिल देशमुख हे 1995 सालापासून सातत्याने काटोल विधानसभा क्षेत्रातून निवडणूक जिंकले आहेत. अपवाद फक्त 2014 सालचा. त्यावेळी अनिल देशमुख यांना त्यांचा पुतण्या आशिष देशमुखने पराभूत केलं. पण 2019 मध्ये अनिल देशमुख पुन्हा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले.
महायुतीमध्ये काटोलची जागा भाजपाकडे आहे. भाजपाने अजून या जागेवर उमेदवाराची घोषणा केलेली नाही. काटोलच्या जागेसाठी चरणसिंग ठाकूर आणि आशिष देशमुख दोघांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. चरणसिंग ठाकूर यांना काटोलमधून तिकीट निश्चित झाल्याची चर्चा सुरु होताच आशिष देशमुख यांनी तातडीने मुंबई गाठून हालचाली केल्या. आशिष देशमुख 28 ऑक्टोंबरला उमेदवारी अर्ज दाखल करतील असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.
काटोलमध्ये कुणबी, तेली समाजाचे प्राबल्य आहे. बौद्ध, मागासवर्गीय मतदारसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत.