महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागांवर लढणार? मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित, कोण किती जागा लढणार?

| Updated on: Oct 02, 2024 | 8:44 PM

महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला आता जवळपास निश्चित झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागांवर लढणार? मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित, कोण किती जागा लढणार?
महाविकास आघाडी
Image Credit source: ANI
Follow us on

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे 8 ते 10 दिवस शिल्लक आहेत. येत्या आठ दिवसांत आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. महाविकास आघाडीच्याही गेल्या काही दिवसांमध्ये मॅरेथॉन बैठका पार पडल्या आहेत. खात्रीलायक सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती मिळत आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला आता अंतिम टप्प्यात आहे. जवळपास निश्चितही झालेला आहे. यामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील समाजवादी पक्ष आणि शेकाप सारख्या पक्षांना 3 ते 5 जागा सुटण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मविआची आज बैठक पार पडली. त्यानंतर पुढच्या आठवड्यात सलग तीन दिवस मविआच्या मॅरेथॉन बैठका पार पडणार आहेत. या तीन बैठकांमध्ये जागावाटप अंतिम होईल आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर जागावाटप जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

कोणता पक्ष किती जागांवर लढणार?

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गट 95 ते 100, काँग्रेस 100 ते 105 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 80 ते 85 जागा लढवणार असल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपाबाबत 7,8 आणि 9 तारखेला बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या अंतिम फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागांवर लढण्याची शक्यता आहे.

जागावाटप कसं ठरतंय?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनुसार जागावाटप पार पडत आहे. स्ट्राईक रेट महत्त्वाचा मानला जातोय. लोकसभा निवडणुकीत 17 जागांवर लढून काँग्रेसने 13 खासदार जिंकले आहेत. तसेच काँग्रेसचा एक अपक्ष खासदारही आहे. तर ठाकरे गटाने 21 जागा लढवून 9 खासदार जिंकले. शरद पवार गटाने 10 जागा लढवून 8 खासदार निवडून आणले. मुख्यमंत्रीपदाचा दावा मजबूत ठेवण्यासाठी काँग्रेस सर्वाधिक जागा लढत आहे. तर ठाकरे गटही मुख्यमंत्रीपदासाठी तसा प्रयत्न करत आहे.

महाविकास आघाडीत गेल्या चार दिवसांपासून विदर्भावरुन तिढा निर्माण झाला होता. काँग्रेसला विदर्भात सर्वाधिक जागा हव्या होत्या. पण ठाकरे गटाचा देखील त्या जागांवर दावा होता. लोकसभेला आम्ही अमरावती आणि रामटेक या सिटिंग जागा दिल्या. त्यामुळे विदर्भातही आम्हालाही जागा हव्या आहेत, असा ठाकरे गटाचा दावा होता. यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत जागावाटपावेळी खटके उडाले होते. पण आता वाद मिटले आहेत. पुढच्या तीन बैठकांमध्ये अंतिम निर्णय होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “अजून आमची चर्चा पुढे सरकते आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे प्रमुख पक्ष जरी असले तरी इतक घटक पक्ष जे आमच्यासोबत लोकसभेला होते, त्यांना कसं सामावून घेता येईल याबाबत आम्ही चर्चा केली. जागावाटपाची चर्चा आता जवळपास संपुष्टात आली आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “ज्याअर्थी महाविकास आघाडीत छोटे पार्टनर आले आहेत त्या अर्थी मोठ्या पार्टनरनी सेटलमेंट केलेली आहे. सिटिंग आमदाराला संधी दिली जाणार याबाबत कुठलीही शंका नाही. जवळपास 200 ते 250 जागांवर चर्चा पूर्ण झाली आहे. माझ्या माहितीनुसार, दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही यादी जाहीर करुन टाकू”, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.