Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांचं हे विधान विनोद तावडेंच्या महाराष्ट्रातील कमबॅकचे संकेत का?

| Updated on: Jun 11, 2024 | 11:25 AM

Chandrakant Patil : सध्या केंद्राच्या राजकारणात सक्रीय असलेल्या विनोद तावडे यांच्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचं सुद्धा कौतुक केलं. तब्येत बरी नसतानाही या निवडणुकीत सर्वाधिक कष्ट उद्धव ठाकरे यांनी घेतले असं ते म्हणाले.

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांचं हे विधान विनोद तावडेंच्या महाराष्ट्रातील कमबॅकचे संकेत का?
Vinod Tawade
Follow us on

“मोहनजी भागवत हे काय बोलले मला माहित नाही. ते आमचे पालक आहेत. पालकत्वाच्या नात्याने त्यांनी काही सांगितलं असेल, तर आम्ही त्याचा विचार करू” असं भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. विनोद तावडेंबद्दलही चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलय. “विनोद तावडे हे पक्षाच्या सरचिटणीस पदापासून काम करत आहेत. त्यांच्यावर जी जबाबदारी आजपर्यंत दिली, ती त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यामुळे त्यांना पक्षात आता मोठी संधी दिली जाऊ शकते. ती संधी सुद्धा ते यशस्वीपणे पार पाडतील” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ती जबाबदारी कोणती असेल? या बाबत चंद्रकांत पाटील जास्त खोलात गेले नाहीत. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे महाराष्ट्राच्या राजकारणात कमबॅक करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी उध्दव ठाकरेंच सुद्धा कौतुक केलं. “तब्येत बरी नसतानाही या निवडणुकीत सर्वाधिक कष्ट उद्धव ठाकरे यांनी घेतले आहेत” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. त्याचवेळी ते असही म्हणाले की, “युती तोडून उद्धव ठाकरेंनी काय मिळवलं? 18 जागांवरून नऊ जागा आल्या. शिवाय अल्पसंख्याकांच्या जीवावर निवडून आले हा ठपका पडला आणि पक्षाची वाताहत झाली ते वेगळच. उद्धव ठाकरेंसोबत असणारे एक वरून तेरा वर गेले. पवार यांनीही आपला फायदा करून घेतला” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बदलासंदर्भात काय म्हणाले?

भाजपमध्ये एकावेळी अनेक जबाबदाऱ्या शक्यतो दिल्या जात नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. “येत्या काळात तीन मोठ्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जे पी नड्डा यांच्यावर पुढच्या तीन महिन्यांसाठी जबाबदारी कायम ठेवली जाऊ शकते. हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठांचा आहे” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.