पहाडासारखे मनोज जरांगे भर स्टेजवर रडले, डोळे पुसत पुसतच सरकारवर हल्लाबोल; समाजाला पोटतिकडीचं आवाहन काय?

| Updated on: Jul 06, 2024 | 7:50 PM

त्यांची नोंद नसून त्यांना आरक्षण मिळतंय. आमची नोंद असून आरक्षण नाही. कैकाडी समाजाचे लोक आले होते. त्यांची जात विदर्भात एससीत आहे. खान्देशात एसटी आरक्षणात आहे आणि मराठवाड्यात ओबीसी आरक्षणात आहे. मंडल कमिशनने एकच जात तीन आरक्षणात टाकली. मंडल आयोगाने काडी लावली. आम्हाला कोणत्याही एकाच वर्गात आरक्षण द्या अशी कैकाडी समाजाची मागणी आहे. ,मराठवाड्यात कैकाडी समाजाची मुलगी एससी आहे. पण विदर्भात लग्न करून गेली तर ओबीसी होते. आपल्यासारखंच आहे. आपली पोरगी विदर्भात गेली तर कुणबी होते आणि मराठा पोरगी मराठवाड्यात आली की ओपन कॅटेगिरीत जाते.

पहाडासारखे मनोज जरांगे भर स्टेजवर रडले, डोळे पुसत पुसतच सरकारवर हल्लाबोल; समाजाला पोटतिकडीचं आवाहन काय?
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालं आहे. हिंगोलीतून त्यांनी रॅलीला सुरुवात केली आहे. ही रॅली 13 तारखेपर्यंत चालणार आहे. विदर्भातच ही रॅली प्रामुख्याने चालणार आहे. या रॅलीतून मनोज जरांगे मराठा समाजामध्ये जनजागृती करत आहेत. सरकारने काय आश्वासन दिलं आणि पुढची रणनीती काय असेल? आपल्या विरोधात कसं षडयंत्र सुरू आहे, याची माहिती मनोज जरांगे मराठा समाजाला देत आहेत. हिंगोलीत त्यांनी आज मराठा समाजाला संबोधित केलं. स्टेजवरून भाषण करत असतानाच जरांगे यांना अश्रू अनावर झाले. जरांगे भर स्टेजवर रडले. डोळ्यातील अश्रू पुसत पुसतच यावेळी त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.

माझा समाज मोठा होईल म्हणून मी तुमच्यासाठी लढत आहे. माझ्या समाजाने खूप वेदना सहन केल्या आहेत. समाजातील लेकरं मोठी व्हावेत असं वाटतंय. मला सरकारने उघडं पाडण्याचं ठरवलं आहे.जरांगे खूप लढतोय. तो ऐकत नाही. तो निष्ठावंत आहे. त्यामुळेच मला उघडं पाडण्याचं षडयंत्र सुरू झालं आहे. म्हणूनच मला माझी हात जोडून विनंती आहे. मला उघडं पाडू देऊ नका. मला तुमची साथ पाहिजे, असं सांगत असतानाच मनोज जरांगे पाटील यांचा कंठ दाटला. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले. डोळे पुसत पुसतच समाजाला आवाहन, विनंती, अर्जव करत असतानाच ते सरकारवर हल्लाबोलही करत होते.

मॅनेज होणार नाही, फुटणार नाही

मी यांना मॅनेज होणार नाही. मी फुटणार नाही. यांनी लोकं मारायला पाठवले तरी हटणार नाही. मी कणखर मराठा आहे, यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकद आहे. मला बदनाम केलं जात आहे. मराठ्यांचे लोकं फोडून मराठ्यांकडून बदनाम केलं जात आहे. मला आरक्षण आंदोलनातून बाजूला करण्याचा प्रयत्न आहे. आपलेही काही बिनलाजे लोक पत्रकार परिषदा घेऊन उलटंसुलटं बोलत आहेत. त्यांना अमिष दाखवली गेली आहे. माझ्याकडे पैसा नाही, प्रॉपर्टी नाही. मी कुणाचा पैसा घेतला नाही. माझे मराठ्यांचे लेकरं अधिकारी बनलेले मला पाहायचं आहेत, असं सांगत असतानाही मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यात अश्रू होते.

छाताडावर बसून आरक्षण देतो

एकतर सरकार पडेल नाही तर हा आरक्षण देईल, असं सरकारला वाटतं. म्हणून ते मला हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी निष्ठावंत आहे. मी कडवट बोलतो. माझ्या मनात कपट नाही. मी निर्भिडपणे बोलतो. ते लोकांना सहन होत नाही. काही लोकांना वाटतं पैसा आणि पदे मिळवली पाहिजे. मला वाटतं समाजाच्या रक्ताचा सौदा करून संसार मोठा करू नये. आपला समाज आपल्याच बळावर मोठा झाला पाहिजे. आपले लेकरं अधिकारी झाले पाहिजेत, हे स्वप्न घेऊन जात आहे. माझं एकच आवाहन आहे, तुम्ही कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. माझ्या पाठी पाठबळ आणि आशीर्वाद द्या. यांच्या छातीवर बसून आरक्षण देतो, असंही ते म्हणाले.

ही उणीदुणी काढण्याची वेळ नाही

मराठ्यांवर मुद्दाम अन्याय केला जातो. सगेसोयरेंची मागणी आपण केली. त्याचा अध्यादेश काढला गेला आहे. त्यात सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याबाबत स्पष्ट लिहिलं आहे. समजा सगेसोयऱ्यांचं आरक्षण नाही मिळालं. ते आरक्षण उडालं. ठिक आहे. मी पुन्हा लढेन. पण ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देईल. पण मी कुणाला मराठ्यांचा गैरवापर करू देणार नाही. कुणाला पद आणि पैसा मिळवू देणार नाही. मी आरक्षण मिळवून देणारच. काही लोक माझ्या चुका शोधण्याचं काम करत आहेत. मला त्रास देत आहेत. का त्रास देत आहात? आज एकमेकांची उणीदुणी काढण्याची वेळ नाही. समाजावर संकट घोंगावत आहेत. सरकारने आरक्षण नाही दिलं तर पुन्हा मुंबईला यावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं.