ठाकरे आणि पवार गटाचे आमदार भाजपच्या संपर्कात? मोहित कंबोज यांच्या भूकंपाच्या भाकितावर मुनगंटीवार काय म्हणाले?

| Updated on: May 16, 2024 | 10:34 PM

"शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे पक्ष मालकी हक्काचे पक्ष झाले आहेत. दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांचे पक्ष राहिले नाहीत. त्यामुळे ज्यांना पटत नाहीत ते बाहेर पडणारच. दोन्ही पक्षात शिल्लक राहिलेल्या आमदारांना मोदींवर केलेली टीका आवडत नाही", असा मोठा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

ठाकरे आणि पवार गटाचे आमदार भाजपच्या संपर्कात? मोहित कंबोज यांच्या भूकंपाच्या भाकितावर मुनगंटीवार काय म्हणाले?
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार
Follow us on

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या एका ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 4 जूनला लागणार आहे. या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. “फिर से खेला होबे! 4 जूननंतर पुन्हा राजकीय भूकंप होणार. शरद पवार गट आणि ठाकरेंचा गट फुटणार. त्यांच्या गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत”, असा मोठा दावा मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. मोहित कंबोज यांच्या या वक्तव्याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुनगंटीवार यांनी सविस्तर भूमिका मांडली.

“शिवसेना आतापर्यंत तीन वेळा फुटली. व्यक्तिगत मालकीची सेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून स्वतःच नाव देण्याची गरज काय?”, असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. “शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे पक्ष मालकी हक्काचे पक्ष झाले आहेत. दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांचे पक्ष राहिले नाहीत. त्यामुळे ज्यांना पटत नाहीत ते बाहेर पडणारच. दोन्ही पक्षात शिल्लक राहिलेल्या आमदारांना मोदींवर केलेली टीका आवडत नाही”, असा मोठा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

“सत्ता येणार असल्याचा साक्षात्कार झाल्याने अहंकार आणि घमेंड यांना आली आहे. त्यामुळे जेलमध्ये टाकण्या वलग्ना केल्या जात आहेत. रावणासारखी घमेंड आली आहे. यांची सत्ता येणार नाही. किमान चार जून नंतर तरी सत्ता येणार असे म्हणायला हवे होते”, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

शंभूराज देसाई यांचंदेखील सूचक वक्तव्य

दरम्यान, शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी देखील महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीत सहभागी होतील, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर लोकसभा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी महायुतीला आतून मदत केली. पण आपण सध्या तरी अशा नेत्यांची नावे घेऊ शकत नाही, असा मोठा गौप्यस्फोट शंभूराज देसाई यांनी केला आहे.