शरद पवार यांचे 5 सर्वात मोठे गौप्यस्फोट, महाराष्ट्राच्या राजकारणात काही बदल होणार?

| Updated on: May 20, 2024 | 1:03 AM

शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. शरद पवारांनी याआधी घडलेल्या घडामोडींबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी केलेल्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काही बदल होतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शरद पवार यांचे 5 सर्वात मोठे गौप्यस्फोट, महाराष्ट्राच्या राजकारणात काही बदल होणार?
शरद पवार
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्या या गौप्यस्फोटांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खरंच काही बदल होतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या बैठकीत आला होता का? या प्रश्नाचं उत्तर शरद पवार यांनी दिलंय. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नावाला आमची हरकत नव्हती, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे 2004 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते, असा मोठा दावा शरद पवारांनी केलाय. शरद पवार यांनी असे अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यापैकी 5 महत्त्वाच्या गौप्यस्फोटांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

शरद पवार यांचे 5 महत्त्वाचे गौप्यस्फोट

  1. “विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. पण त्यांचं नाव आमच्यापुढे आलं नाही. एकनाथ शिंदे यांच्या नावाबद्दल शिवसेनेअंतर्गत चर्चा झाल्याचं नंतर समजले”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
  2. “2014 मध्येच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होता, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला. भाजप आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. शिवसेना भाजपसोबत गेली आणि 2014 मध्ये महाविकास आघाडीचा आमचा प्रयोग फसला”, असंदेखील शरद पवार म्हणाले.
  3. “प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते. काँग्रेसबरोबर जाण्यास प्रफुल्ल पटेल यांनी विरोध केला होता. तरीदेखील युपीए सरकारमध्ये आम्ही पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद दिलं. 2004च्या निवडणुकीच्या आधीपासून प्रफुल्लभाई सारखं सांगायचे की, या निवडणुकीत आपले पक्ष टिकणार नाहीत. वाजपेयींना पर्याय नाही. आपण सगळे भाजपमध्ये जाऊ, तासंतास त्यांनी आग्रह केला होता. शेवटी मी नाही म्हणून सांगितलं. तुम्ही जा म्हणून सांगितलं. शेवटी अक्षरश: त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं”, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला.
  4. “2004 मध्ये पक्षाकडे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेता नव्हता. अजित पवार त्यावेळी नेता नव्हता. अजित दादा नवखे होते. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती”, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला.
  5. “काँग्रेसबाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले छोटे पक्ष विलीन होऊ शकतात. आपला पक्ष विलीन करण्याचा विचार नाही. पुढे हा पर्याय त्याज्य नाही”, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.