भगीरथ भालके पुन्हा करणार घरवापसी? शरद पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

| Updated on: Jul 07, 2024 | 11:13 AM

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी नुकतंच शरद पवारांची भेट घेतली.

भगीरथ भालके पुन्हा करणार घरवापसी? शरद पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
Follow us on

Bhagirath Bhalke Meet Sharad Pawar : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर आता सध्या अनेक पदाधिकारी, नेत्यांचे इनकमिंग आऊटगोईंग पाहायला मिळत आहे. त्यातच आता पंढरपूर तालुक्यात शरद पवार पुन्हा मोठा धक्का देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी नुकतंच शरद पवारांची भेट घेतली.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात झालेल्या गेल्या पोटनिवडणुकीत 1 लाख 5 हजार मते घेऊन अगदी थोडक्या मतांनी पराभूत झालेले भगीरथ भालके हे नाराज झाले होते. या नाराजीनंतर भगीरथ भालकेंनी राष्ट्रवादीला रामराम करत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आज रविवारी 7 जुलै रोजी भगीरथ भालकेंनी शरद पवारांची भेट घेतली. आज गोविंद बागेत ही भेट झाली. या भेटीनंतर भगीरथ भालके पुन्हा घरवापासी करणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

पंढरपुरात राष्ट्रवादीची ताकद वाढणार?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे सध्या गोविंदबागेत अनेक कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी करत आहेत. त्यातच आता भगीरथ भालके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे पंढरपुरातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. या भेटीनंतर अनेक चर्चांनाही उधाण आले आहे. तसेच जर भगीरथ भालके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असतील तर पंढरपुरात राष्ट्रवादीची ताकद नक्कीच वाढेल, असे बोललं जात आहे.

हे सुद्धा वाचा
आज बारामती येथे आदरणीय शरद पवार साहेब यांची भेट घेऊन सत्कार केला व आशीर्वाद घेतले त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार सुप्रियाताई सुळे यांचाही सत्कार केला, अशी पोस्ट भगीरथ भालके यांनी फेसबुकवर केली आहे. त्यासोबत त्यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीचे काही फोटोही शेअर केले आहेत.

भगीरथ भालके यांचा अल्पपरिचय

भगीरथ भालके हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र आहेत. भारत भालकेंच्या निधनानंतर रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांचा पराभव झाला. भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. यावेळी भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. त्यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व 18 संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावाला पसंती दिली होती.

भगीरथ भालके हे गेल्या दहा वर्षांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात काम करत आहेत. साखर कारखाना अडचणींतून बाहेर काढण्याची जबाबदारी भगीरथ भालकेंवर आहे.