तर लाडकी बहीण योजना बंद करू… काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या विधानावर राजकारण तापले; कुणाकुणाच्या निशाण्यावर?

| Updated on: Sep 18, 2024 | 6:08 PM

काँग्रेस नेते सुनील केदार यांनी लाडकी बहीण योजनेवर केलेल्या विधानाचे चांगलेच पडसाद उमटले आहेत. सुनील केदार यांनी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर ही योजना बंद करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी केदार यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे.

तर लाडकी बहीण योजना बंद करू... काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या विधानावर राजकारण तापले; कुणाकुणाच्या निशाण्यावर?
sanjay nirupam
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून त्यावर टीका सुरू आहे. या योजनेत काही ना काही अडथळे आणण्याचे प्रयत्नही केले जात आहे. मात्र, राज्य सरकारने ही योजना यशस्वी करून दाखवली आहे. आता या योजनेवर काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी मोठं विधान केलं आहे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे. केदार यांच्या या विधानाचा सत्ताधारी आमदारांकडून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.

शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी सुनील केदार यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. सत्ता आल्यास लाडकी बहीण योजना बंद करू असं केदार म्हणाले आहेत. यावरून काँग्रेसची मानसिकता उघड झाली आहे. हे प्रकरण नागपूर उच्च न्यायालयात सुरू आहे. लाडकी बहीण योजना ही यशस्वी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून 1 कोटी 60 लाख महिलांना मदत मिळत आहे. महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी भगिनींच्या घरी मुख्यमंत्री भेट देत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. आधीच काँग्रेसला अंतर्गत समस्यांचा सामना करावा लागत असून त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे काँग्रेस हादरली आहे, असं संजय निरुपम यांनी म्हटलंय.

इकडे विरोध, तिकडे कॉपी

लाडकी बहीण योजना ही महिलांचे मते विकत घेण्याची योजना आहे, असं सुनील केदार म्हणाले. खरं तर असं विधान करणं हा महिलांचा अपमान आहे. महाराष्ट्रात काँग्रेस लाडकी बहीण योजनेला विरोध करत असताना झारखंडमध्ये सरकारने या योजनेवर आधारित मैय्या सन्मान योजना आणली आहे. बदलापूर येथील आंदोलनावेळी त्यांनी लाडकी बहिण योजनेचे पोस्टर आणले होते. महाविकास आघाडी या योजनेच्या विरोधात आहे. सुनील केदार आणि काँग्रेसने महाराष्ट्रातील महिलांची माफी मागावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.

हाच काँग्रेसचा खरा चेहरा

सुनील केदार यांच्या विधानावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहrण योजना’ भविष्यात महाभकासचं सरकार जर आलं तर काँग्रेसचे भ्रष्ट नेते सुनील केदार ती बंद करणार आहेत म्हणे. महाराष्ट्रातील चांगल्या योजनांना कायम विरोध करणारा हा आहे लाचार काँग्रेसचा खरा चेहरा, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.